ताईच्या जेलभरोने पोलीस दमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:51 IST2017-10-06T00:51:13+5:302017-10-06T00:51:13+5:30
अंगणवाडी कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढल्यामुळे आयटकप्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला व तेथे जेलभरो सत्याग्रह सुरू केला

ताईच्या जेलभरोने पोलीस दमले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अंगणवाडी कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढल्यामुळे आयटकप्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला व तेथे जेलभरो सत्याग्रह सुरू केला. तथापि, आंदोलक महिला कर्मचा-यांना अटक करून पोलीस व्हॅनच्या साहाय्याने आयुक्तालयात नेऊन सोडण्यात आले. यासाठी व्हॅनला तब्बल २२ ते २३ फे-या माराव्या लागल्यामुळे पोलिसांची मात्र दमछाक झाली.
अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाचा आज २५ वा दिवस आहे. शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ जाहीर केली; पण ती संघटनांच्या कृती समितीला अमान्य आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
परिणामी, जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार वितरणाची प्रक्रिया मुख्य सेविका, स्थानिक बचत गट व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून पार पाडली जात आहे, असे असले तरी अनेक अंगणवाड्यांना आंदोलक सेविका व मदतनिसांनी कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांच्यावर किल्ल्या देण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप आज सेविका व मदतनिसांनी केला. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास पैठणगेट येथून अंगणवाडी कर्मचा-यांच्या मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेवर हा मोर्चा धडकण्यापूर्वीच तेथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे दोन्ही मुख्य दरवाजे बंद करण्यात आले. मात्र, मोर्चेकरी महिला ‘जेलभरो’वर आग्रही होत्या. त्यामुळे पोलिसांनी एका मुख्य प्रवेशद्वारातून २५-३० आंदोलक महिलांना जिल्हा परिषदेत प्रवेश दिल्यानंतर पुन्हा दरवाजा बंद केला जात होता. त्या महिलांनी घोषणाबाजी करत जिल्हा परिषद दणाणून सोडली. काही वेळानंतर मग त्या महिलांना व्हॅनमध्ये बसवून पोलीस त्यांना आयुक्तालयाच्या मैदानावर सोडून परत यायचे. आंदोलक महिलांना अटक करून पोलीस आयुक्तालयाच्या मैदानात सोडण्यासाठी व्हॅनला जवळपास २२ ते २३ फेºया माराव्या लागल्या. प्रा.राम बाहेती, अनिल जावळे, अभय टाकसाळ, बुद्धप्रिय कबीर, विलास शेंगुळे, तारा बनसोडे, शालिनी पगारे, माया भिवसाने, शीला साठे, मीरा अडसरे, संगीता वैद्य, ललिता दीक्षित, सुनीता शेजवळ आदी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड तसेच महिला व बालकल्याण विकास विभागाचे अधिकारी संजय कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.