खेळाडू वाढीव गुणाचे भिजत घोंगडे
By Admin | Updated: April 26, 2016 23:46 IST2016-04-26T23:33:25+5:302016-04-26T23:46:15+5:30
बळीराम लाड, नांदेड दहावी व बारावी परीक्षेत वर्ष २०१५-१६ मध्ये बसलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या खेळाडूंना शासनाच्या वतीने वाढीव ग्रेस गुण देण्यात येतात.

खेळाडू वाढीव गुणाचे भिजत घोंगडे
बळीराम लाड, नांदेड
दहावी व बारावी परीक्षेत वर्ष २०१५-१६ मध्ये बसलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या खेळाडूंना शासनाच्या वतीने वाढीव ग्रेस गुण देण्यात येतात. यावर्षी दहावी व बारावीचा निकाल एक महिन्यावर आला असतानाही क्रीडा विभागाकडून मान्यताप्राप्त संघटनेच्या याद्याला मान्यता मिळाली नाही. वाढीव ग्रेस गुण यावर्षी मिळणार की नाही, अशी भीती खेळाडू व पालकांत व्यक्त होत आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांत मान्यताप्राप्त क्रीडा संघटनेकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. त्या स्पर्धेमध्ये दहावी-बारावी या वर्गात शिकत असलेले खेळाडू सहभागी झाले होते. त्यांना वाढीव गुण प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या क्रीडा कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यासाठी राज्य क्रीडा विभागाकडून संघटनेच्या याद्या जाहीर न झाल्यामुळे अडचणी येत आहेत. स्पर्धा घेऊन राज्य संघटना तथा असोसिएशनचे पदाधिकारी नामानिराळे झाले असून खेळाडू व पालक अडचणीत आले आहेत.
शालेय गटातील वाढीव गुण प्रस्ताव एक महिन्यापूर्वीच क्रीडा विभागाच्या वतीने दाखल करुन घेण्यात आला. परंतु राज्य संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धातील खेळाडूंचे प्रस्ताव जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात दाखल करुन घेत नाहीत.
याबाबत क्रीडाधिकारी कार्यालय, राज्य संघटना पदाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ तसेच शासनाच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तत्काळ समन्वय साधून वाढीव गुण प्रस्ताव स्वीकारुन खेळाडूंना वाढीव गुण मिळावेत, अशी मागणी पालकांतून होत आहे. वाढीव गुणाचा प्रश्न निकाली निघाल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल़ (प्रतिनिधी)