पादचार्यांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: May 25, 2014 01:30 IST2014-05-25T01:14:26+5:302014-05-25T01:30:21+5:30
औरंगाबाद : रोशनगेट ते चंपाचौक हा रस्ता खूप अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा बाजूने नागरिक वाहने उभी करतात.

पादचार्यांचा जीव धोक्यात
औरंगाबाद : रोशनगेट ते चंपाचौक हा रस्ता खूप अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा बाजूने नागरिक वाहने उभी करतात. एक दुचाकी वाहन दोन्ही बाजूने ये-जा करू शकते एवढीच जागा रस्त्यावर उरते. त्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारक तुटलेल्या दुभाजकाचा फायदा घेऊन वाहने चालवत असल्याने पादचार्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अत्यंत दाट आणि २४ तास गजबजलेल्या वसाहती आहेत. रोशनगेट ते चंपाचौक या मुख्य रस्त्यावर सकाळ-सायंकाळ रस्ता ओलांडणे खूपच अवघड होते. ८० फूट रूंद रस्ता प्रत्यक्षात वापर करताना २० ते ३० फूटच मिळतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठिकठिकाणी झालेली अतिक्रमणे आणि दुकानांसमोर उभी असणारी वाहने अलीकडच्या काळात डोकेदुखी ठरत आहेत. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत, तर या भागात सतत ट्रॅफिक जाम होत असते. दुपारी साडेबारा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर सीमा दूध डेअरीजवळ विद्यार्थ्यांची वर्दळ असते. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. १५ वर्षांपूर्वी चंपाचौक ते रोशनगेट रस्त्यावर मनपाने दुभाजक उभारून लोखंडी ग्रिल उभारले होते. काळानुसार हे ग्रिल आज गायब झाले आहेत. दुचाकी वाहनधारक याचा फायदा उचलत या रस्त्यावरून त्या रस्त्यावर सहजपणे ये-जा करतात. अनेक वाहनधारक नको त्या ठिकाणी वळसा घेत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे मनपा कधीच लक्ष देत नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने पादचार्यांना ये-जा करण्यासाठी अजिबात जागा नसते. रस्त्याच्या कडेने लहान मुले, महिला ये-जा करीत असतात. त्यातही भरधाव वेगाने दुचाकी वाहनधारक पादचार्यांच्या अंगावरच वाहने घालतात. या रस्त्यावर एक शाळाही आहे. शाळा सुटल्यानंतर तर बर्याचवेळा ट्राफिक जाम होते.ऐतिहासिक रोशनगेटच्या उजव्या बाजूला खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने या रस्त्याची डागडुजी तरी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि व्यापार्यांनी केली आहे.