वंशावळ शंभरीच्या उंबरठ्यावर !
By Admin | Updated: August 18, 2015 00:06 IST2015-08-18T00:06:45+5:302015-08-18T00:06:45+5:30
संजय तिपाले , बीड चारा- पाण्याची सोय होत नाही म्हणून हतबल झालेले शेतकरी गुरांचा बेभाव बाजार करतअसताना दुसरीकडे मात्र, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील

वंशावळ शंभरीच्या उंबरठ्यावर !
संजय तिपाले , बीड
चारा- पाण्याची सोय होत नाही म्हणून हतबल झालेले शेतकरी गुरांचा बेभाव बाजार करतअसताना दुसरीकडे मात्र, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एका शेतकरी कुटुंबाने गुरांच्या रक्षणाचे व्रत स्वीकारले आहे. एका गाईपासून सुरु झालेली गोसेवेची परंपरा आज तिसरी पिढीही तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहे. दुष्काळी परिस्थितीतही ते स्वत:कडील नव्वदपेक्षा अधिक व इतरांनी आणून सोडलेल्या वीस ते पंचवीस जनावरांचा सांभाळ करत आहेत.
कडाजीराव कोंडीबा जाधव यांचे पवारवाडी शिवारातील देवकृपानगरात शेत आहे. त्यांचे वडील दिवंगत कोंडीबाराव जाधव यांनी ४० वर्षांपूर्वी गुंजथडी (ता. माजलगाव) येथील शेतकऱ्याकडून तांबड्या रंगाची गाय ४०० रुपयांत विकत आणली होती. अंगापिंढाने मजबूत असलेल्या या गाईचे पहिले वेत जाधव यांच्याचकडे झाले. या गाईला ते खूप जीव लावत. वासरांचाही कोंडीबाराव यांना पोटच्या लेकरागत लळा. त्यांनी ठरवले या गाईचे जित्राब अन् दूध कधीच विकायचे नाही. वासरू होवो अथवा कालवड दोन्हींचा ते आंनदाने सांभाळ करत. त्यामुळे गायीची वंशावळ वाढत गेली अन् गोठ्याला नंदनवनाचे स्वरुप येत गेले. २२ वर्षांपूर्वी गाय दगावली तेंव्हा घरातील माणूस गेल्याचे दु:ख जाधव कुटुंबियांना झाले होते. २००९ मध्ये कोंडीबाराव जाधव यांचे निधन झाले.
कडाजीराव जाधव यांनी या गायीच्या वासराला पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावला. वडिलांनी गाईला आईप्रमाणे लावलेले प्रेम कडाजीराव यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांनी गोसेवेत कशाचीही कमी पडू दिली नाही. आता अप्पासाहेब, विठ्ठलराव तसेच मुंजाबा ही त्यांची तीन मुलेही त्यांना याकामी मदत करतात. गोसेवेला व्यापक स्वरुप देण्यासाठी जाधव यांनी गोठ्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दोन पूर्णवेळ मजूरही दिमतीला आहेत.
एका गुराला महिन्याकाठी सर्वसाधारणे ८ क्विंटल ४० किलो चारा लागतो. जाधव यांच्या गोठ्यात १०० पेक्षा जास्त गुरे आहेत. त्यासाठी २५ लाख मेट्रीक टन चाऱ्याची महिन्याकाठी गरज भासते. आपल्या सात एकर शेतात त्यांनी घास, मका, ज्वारी, बाजरी पेरून चाऱ्याची तरतूद केली आहे. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी दोन विहिरीतील पाणी चारा जगविण्यासाठी ठिबकद्वारे सोडले. जनावरांचे मूत्र पाईपद्वारे लगतच्या हौदात सोडले आहे. त्याला जोडूनच शेण साठविले जाते. शेण व मूत्र एकत्रित करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करतात. हेच खत नंतर शेतात वापरले जाते.
गोसेवा हीच ईश्वर सेवा आहे. माझ्या वडिलांनी आणलेल्या गायीची वंशावळ ९० च्या पुढे गेल्याचे पाहून आनंद होतो. मुलेही मोठ्या परिश्रमाने गुरांचा सांभाळ करतात. परिसरातील शेतकरी आपली गुरे आणून सोडत आहेत. दुष्काळी स्थितीत या गुरांचाही सांभाळ करायचा आहे. - कडाजीराव जाधव, शेतकरी