हलगर्जीपणाचा कळस
By Admin | Updated: June 13, 2017 00:56 IST2017-06-13T00:56:09+5:302017-06-13T00:56:39+5:30
बीड : बिंदुसरा नदीवरील पूलावरून वाहतूक बंद केली आहे.

हलगर्जीपणाचा कळस
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बिंदुसरा नदीवरील पूलावरून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सोलापूर, लातूरकडे जाणारी जडवाहने बीड येथील शिवाजी चौकातून नगर रोड, नायगाव, रोहतवाडी, शंभरचिरा, पाटोदा, लिंबागणेश, मांजरसुंबा मार्गे जाणार आहेत. तर बीडकडे येणारी वाहने मांजरसुंबा, बार्शी नाका, तेलगाव नाका, नाळवंडी नाका, खंडेश्वरी मंदिर, एमआयडीसी, मन्सुरशहा दर्गा रस्ता, मसरत नगर, जालना रोडमार्गे येतील.
त्यामुळे आधीच खराब असलेले शहरातील अंतर्गत रस्ते आणखी खराब होणार आहेत. जुना मोंढा, मन्सूर शाह दर्गा ते रामतीर्थपर्यंत रस्त्याची वाट लागलेली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने आता पुन्हा या रस्त्यावरून जड वाहतूक होणार आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असल्याने मोंढा भागात येणारी जड वाहने तसेच इतर वाहतुकीमुळे सोमवारपासूनच दर दहा मिनिटाला ट्रॅफिक जामचा अनुभव येत असून वेळेचा अपव्यय होत आहे. तसेच मांजरसुबा ते पाटोदा रस्त्याची दुरवस्था कायम आहे. जड वाहतुकीमुळे रस्ते आणखी खराब होणार आहेत.
वाहनधारकांना फटका
मांजरसुंबा ते बीड २० किलोमीटर अंतर आहे. परंतु आता वाहनधारकांना ५० किलोमीटरचा जादा प्रवास करावा लागणार असून वेळेसह आर्थिक फटका बसणार आहे. एसटीतील प्रवाशांनाही प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
बायपासचा प्रश्न मार्गी
लावला असता, तर...
महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने बिंदुसरा नदीवरील पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. पात्रातून केलेला पूल कायमस्वरुपी टिकणार नव्हता. ही बाब लक्षात घेऊन बायपास रस्त्याचे काम वेगात करून वापरात आणणे गरजेचे होते. परंतु, प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले.