हजारो ग्राहकांना विलंब शुल्काचा भुर्दंड
By Admin | Updated: June 26, 2016 00:42 IST2016-06-26T00:18:09+5:302016-06-26T00:42:02+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका चालू महिन्यातही शहरातील वीज ग्राहकांना बसला आहे. वीज बिल भरणा करण्याची अंतिम तारीख येऊनही

हजारो ग्राहकांना विलंब शुल्काचा भुर्दंड
औरंगाबाद : महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका चालू महिन्यातही शहरातील वीज ग्राहकांना बसला आहे. वीज बिल भरणा करण्याची अंतिम तारीख येऊनही असंख्य ग्राहकांना त्यांची बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे शहरातील हजारो ग्राहकांना या महिन्यात विलंब शुल्काचा भुर्दंड बसणार आहे. शहरात महावितरणचे ३ लाख ८ हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांना दर महिन्याला वीज बिल दिले जाते. महावितरणने हे काम खाजगी एजन्सीकडे सोपविलेले आहे. मात्र, गेल्या काही काळापासून चुकीची रीडिंग नोंदवून अव्वाच्या सव्वा बिले देणे, बिल देण्यास उशीर होणे, असे प्रकार एजन्सीकडून सुरू आहेत. चालू महिन्यातही शहरातील छावणी, सातारा, अलोकनगर, भाग्योदयनगर, देवळाई, बीड बायपास, हडकोतील एम-२, एन- ९, एन-२ यासह (पान १ वरून) किती तरी भागातील वीज ग्राहकांना चालू महिन्याची वीज बिले मिळालेली नाहीत. साधारणपणे १२ तारखेपर्यंत ही बिले मिळणे अपेक्षित असते. या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून शेवटच्या तारखेनंतर विलंब शुल्क आकारले जाते. आता अंतिम तारीख जवळ येऊनही ग्राहकांना बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे आता या ग्राहकांना बिल भरणा करण्यास उशीर होणार आहे. परिणामी त्यांना बिलाची रक्कम विलंब शुल्कासह भरावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माहिती घेतली जाईल दोन-तीन भागांतील वीज बिले जनरेट होणे बाकी आहे. मात्र, इतर भागांतील बिले जनरेट झाली आहेत. त्याचे वाटप करण्यात आलेले आहे. एजन्सीकडून त्याची माहिती घेतली जाईल. - दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता एजन्सींवर नियंत्रण हवे वीज बिलाची रीडिंग घेणे आणि बिलांचे वाटप करण्यासाठी महावितरणने एजन्सीज् नियुक्त केलेल्या आहेत. या एजन्सींवर पूर्ण नियंत्रण गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड बसतो आहे. अधीक्षक अभियंत्यांनी यात लक्ष घालून आवश्यक कारवाई केली पाहिजे. - हेमंत कपाडिया, ग्राहक प्रतिनिधी, वीज नियामक आयोग