बसस्थानकासमोरून प्रवासी पळविणे सुरूच
By Admin | Updated: January 14, 2017 00:17 IST2017-01-14T00:14:53+5:302017-01-14T00:17:06+5:30
तुळजापूर : जिल्ह्यात सध्या सर्वत्र रस्ता सुरक्षितता सप्ताह साजरा केला जात आहे़

बसस्थानकासमोरून प्रवासी पळविणे सुरूच
तुळजापूर : जिल्ह्यात सध्या सर्वत्र रस्ता सुरक्षितता सप्ताह साजरा केला जात आहे़ अपघात रोखण्यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासन जनजागृती करीत आहे़ मात्र, तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील दोन्ही बसस्थानकासमोरून प्रवासी पळविण्याचा प्रकार खासगी वाहनधारकांकडून सुरूच असून, रस्त्यावरच वाहने उभा केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्याचे चित्र ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी केलेल्या पाहणीत समोर आला़
राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात १०० ते २०० मीटर परिसरात खाजगी वाहनाद्वारे प्रवासी वाहतूक होऊन नये असे, दंडक आहेत़ असे असतानाही तुळजापूर शहरातील जुन्या बस्थानकातून व नवीन बसस्थानकासमोरून खासगी वाहनाद्वारे प्रवाशांची पळवापळवी केली जात आहे. तुळजापूर शहरातून १५० ते २०० खाजगी वाहने दररोज अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करतात़ थेट बसस्थानकाच्या आवारातून प्रवासी नेले जात असल्याने राज्य परिवहन महामंडळाला याचा फटका बसत आहे़ शिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व भरधाव वेगातील वाहतूक यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़ बसस्थानकाच्या काही फूट अंतरावरून सद्यस्थितीत खासगी बास, काळी-पिवळीजीप, टमटम, ट्रॅव्हल्स या वाहनाद्वारे सोलापूर, लातूर, नळदुर्ग, उस्मानाबाद, बार्शी इ. मार्गावर प्रवासी वाहतूक केली जात आहे़ काही महिन्यांपूर्वी आगार प्रमुखांनी बसस्थानकातील प्रवासी पळविणाऱ्या वाहनचालकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते़ विशेष म्हणजे आगाराकडून पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देऊनही संबंधित वाहनांवर कारवाई केली जात नसल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, उस्मानाबाद, लातूर, नळदुर्ग, सोलापूर या प्रमुख मार्गावर व जुन्या बसस्थानकासमोरील भागात खासगी वाहने उभा राहत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे़ तर दुसरीकडे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतानाही हा प्रकार पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास येत नाहीच कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)