डोंगर परिसरात पायथ्याशी एनए देण्याचा सपाटा
By Admin | Updated: August 1, 2014 01:09 IST2014-08-01T01:00:21+5:302014-08-01T01:09:01+5:30
विकास राऊत, औरंगाबाद शहर परिसरातील जटवाडा, सातारा, पेठेनगर (विद्यापीठ परिसर) या वसाहती डोंगरपायथ्यापर्यंत गेल्या आहेत.
डोंगर परिसरात पायथ्याशी एनए देण्याचा सपाटा
विकास राऊत, औरंगाबाद
शहर परिसरातील जटवाडा, सातारा, पेठेनगर (विद्यापीठ परिसर) या वसाहती डोंगरपायथ्यापर्यंत गेल्या आहेत. पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाचा विचार न करता डोंगरावर व पायथ्याजवळ एनए परवानगी देण्याचा सपाटा सुरू आहे. भविष्यात भीमाशंकर तालुक्यातील ‘माळीण’ गावासारखे दुर्दैवी संकट डोंगरपायथ्याजवळ येण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
थेट शासनाकडूनच परवानगी
सातारा परिसरातील सुधाकरनगरसारख्या वसाहतींना थेट शासनाकडूनच विशेष एनएची परवानगी आणली जाते. तसेच डोंगरावरील प्लॉटिंगसाठीदेखील शासनाकडूनच एनए आणण्यासाठी उठाठेव केली जाते. शहरातील बहुतांश डोंगरावर प्लॉटिंग झालेली आहे.
फार्म हाऊस, हिलस्टेशनची प्लॉटिंग
शहरालगतच्या डोंगरांवर फार्म हाऊस, हिल स्टेशनच्या नावाखाली प्लॉटिंग केली जात आहे. त्यासाठी डोंगर खोदून रस्ते तयार केले जात आहेत. त्या रस्त्यांचे खोदकाम जेसीबी व भूसुरुंग लावून केले जाते. त्यामुळे डोंगराला अनेक तडे जातात. पावसाळ्यात त्या डोंगराचा काही भाग कोसळतो, त्याला दरड म्हणतात.
एनएवर निर्बंध यावेत
मनपातील नगररचना विभागातील सूत्रांनी सांगितले की, डोंगरपायथ्याजवळ देण्यात आलेल्या वसाहतींना मनपाने परवानगी दिलेली नाही. एनए परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येते. एनए झाल्यास मनपाला परवानगी द्यावी लागते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपा हद्दीबाहेर डोंगराजवळ एनए देण्याबाबत निर्बंध आणणे गरजेचे आहे. अशा वसाहतींमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
डोंगर आले यलो झोनमध्ये
डोंगर ही नैसर्गिक साधन संपती असून त्याचे ग्रीन व यलो झोन कधी ठरविले गेले. ते यलो झोनमध्ये कसे आले. याबाबत पालिकेच्या नगररचना विभागाला काहीही माहिती नाही. राज्य नगररचना विभागाकडूनच ती परवानगी आणली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
साताऱ्याचा तो अनुभव थरारक
दीड वर्षापूर्वी सातारा परिसरात डोंगरामुळे अचानक ढगफुटी झाली होती. त्यामुळे परिसरातील नवीन पूल वाहून गेला होता. नाल्यामध्ये गाळ येऊन साचला होता.
रस्त्यांचा नकाशा बदलला होता. परिसरातील महाविद्यालय, सुधाकरनगरचा संपर्क तुटला होता. हे सगळे कशामुळे झाले, याचे कुणीही चिंतन केले नसून त्या भागातील अनेक टेकड्या भुईसपाट झाल्याचे आता दिसून येते.