पंचनाम्याचा नुसताच फार्स
By Admin | Updated: August 9, 2014 00:38 IST2014-08-08T23:47:42+5:302014-08-09T00:38:21+5:30
लातूर,हरी मोकाशे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ हजार ७११ एकरवरील नामांकित कंपन्याचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी

पंचनाम्याचा नुसताच फार्स
लातूर,हरी मोकाशे यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ हजार ७११ एकरवरील नामांकित कंपन्याचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी २ हजार १९७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़ त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ बहुतांशी शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे मिळाले नाही़ दरम्यान, कृषी विभागाकडून करण्यात येत असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी शेतकऱ्यांसाठी कुठल्याही मदतीची ठोस उपाययोजना नाहीत. पंचनाम्याचा नुसताच फार्स सुरु आहे. जिल्ह्यात खरीपातील सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र ३ लाख ५५ हजार हेक्टर आहे़ नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे राहिला. यातच यंदाच्या हंगामात उशिरा अल्प पाऊस झाला़ त्यामुळे तूर, उडीद, मूग या पिकांच्या पेरणीचा कालावधी संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला़ गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने शासनाने घरगुती बियाणांचा वापर करण्याचे आवाहन केले़ काही शेतकऱ्यांनी उत्पादन घटू नये म्हणून नामांकित कंपन्यांच्या बियाणांचा वापर केला़ पेरणी झालेल्या ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणात घरगुती बियाणांचा वापर झाला़ जवळपास ३० टक्के क्षेत्रावर कंपन्यांच्या बियाणांचा वापर करण्यात आला़ परंतु, बोगस बियाणे लागल्याने काही शेतकऱ्यांच्या बियाणांची उगवण झाली नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार १९७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़ या शेतकऱ्यांचे ५ हजार ७११ एकरवरील बियाणाचे नुकसान झाले़ या तक्रारींची लातूरच्या कृषी सहसंचालकांनी दखल घेऊन बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांना नव्याने बियाणे देण्याचे आदेश कंपन्यांना दिले़ यातील काही शेतकऱ्यांना नव्याने बियाणे मिळाले़ खत, पेरणी खर्चाचे नुकसान सहन करता येईल, अशी मानसिकता ठेऊन नवे बियाणे मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती़ परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे मिळाले नाही़ परिणामी, पेरणीचा हंगाम संपुष्टात आला आहे़ त्यामुळे आता नव्याने जरी बियाणे मिळाले तरी काय उपयोग असा सवाल शेतकऱ्यांतून होत आहे़ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली़ त्यामुळे आजपर्यंत १ हजार ४१७ शेतकऱ्यांचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे़ हे पंचनामे करण्यात येत असले तरी या पंचनाम्यातून काय साध्य होणार आहे? याबाबत कृषी विभागही अनभिज्ञ आहे़ भरपाईच मिळणार नसेल तर पंचनामेच कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांतून होत आहे. कंपन्यांच्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे कंपन्यांनी एकरी उत्पादनाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यायला हवी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांनी केली आहे़ बोगस बियाणामुळे सर्वाधिक नुकसान निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे असून १ हजार ३९ तक्रारी आहेत़ तिथे ६८८ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत़ त्यापाठोपाठ औसा तालुक्यातील आणि त्यानंतर लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ औशातील संख्या ६१० तर लातूर तालुक्यातील संख्या १४८ अशी आहे़ कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत असले तरी शासनाकडून कुठलीही मदत मिळणार नाही़ त्यामुळे बोगस बियाणे बाजारात आणलेल्या कंपन्यांना भरपाई देण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत़ ते मंजूर करुन कितपत भरपाई द्यायची हे कंपन्यांवर अवलंबून आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी महेश क्षीरसागर यांनी सांगितले़