औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक ७५२-ईचे रूंदीकरण १२ वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. २४ एप्रिलला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रूंदीकरण कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. ९०० ते १ हजार कोटींच्या आसपास सदरील रस्त्याचे काम अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहे. १२ वर्षांपासून हा सगळा प्रवास ‘लोकमत’ने वारंवार शब्दबद्ध केला आहे.
पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनएचएआय अशा तीन यंत्रणांच्या कचाट्यांतून हा रस्ता बाहेर पडण्यासाठी एक तपाचा कालावधी गेला. सन २०१० मध्ये पीडब्ल्यूडीकडून ३०० कोटींतून रस्ता केला जाणार होता. नंतर, राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला. मग, एनएचएआयकडे कामाची जबाबदारी देण्यात आल्याने पुन्हा एबीसीडी असा प्रवास सुरू झाला. औरंगाबाद ते पैठण ६० कि.मी. पैठण ते शेवगाव ३० किमी, पुढे २० किमी. तिसगावपर्यंत व तेथून पुढे ३० किमी अहमदनगरपर्यंत या मार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित करण्यात आले. त्यात राज्य महामार्ग आणि एनएचएआय या दोन संस्थांमध्ये दुमत असल्याने काम रखडले. १४० कि.मी.पर्यंत या मार्गासाठी १४०० कोटींच्या आसपास खर्च लागणार होता नंतर, औरंगाबाद ते पैठण या सुमारे ५५ ते ६० कि.मी. अंतराचा विचार करण्यात आला.
रस्त्याचा ‘भारतमाला’मध्ये समावेशकेंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कनक्लेव्ह’ या कार्यक्रमात त्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्याची घोषणा झाली; परंतु डीपीआरच्या कामात अनेक अडथळे आले. आता त्या रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे.
एनएचएआयची माहिती अशीडांबरीकरणातून चौपदरीकरण केले जाईल. दोन उड्डाणपूल त्या रस्त्यावर प्रस्तावित आहेत. नक्षत्रवाडी, गेवराई तांडा येथे पूल, सर्व्हिस रोड होईल. दिल्लीच्या ईजीस इंटरनॅशनल या संस्थेने डीपीआरचे काम केले आहे. शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी जागा देण्याचे निश्चित झाले आहे. पुढच्या महिन्यांत भूमिपूजन होऊ शकते.- अरविंद काळे, प्रकल्प संचालक, एनएचएआय