जल्लोषात रंगला ‘पेज टू स्टेज’ महोत्सव; तरुण लेखकांचे सादरीकरण
By Admin | Updated: October 8, 2014 01:06 IST2014-10-08T00:42:16+5:302014-10-08T01:06:42+5:30
औरंगाबाद : ‘पेज टू स्टेज’ महोत्सवाचे दुसरे पर्व स.भु. महाविद्यालयाच्या नाट्यगृहात साजरे झाले.

जल्लोषात रंगला ‘पेज टू स्टेज’ महोत्सव; तरुण लेखकांचे सादरीकरण
औरंगाबाद : नाट्यशास्त्राचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे प्रात्यक्षिक करण्याची धमाल संधी देणाऱ्या ‘पेज टू स्टेज’ महोत्सवाचे दुसरे पर्व स.भु. महाविद्यालयाच्या गोविंदभाई श्रॉफ नाट्यगृहात नुकतेच साजरे झाले. यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अवतीभोवतीचे अनेक विषय खास शैलीत मांडत उपस्थितांची मने जिंकली.
महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश खैरनार यांनी केले. एकांकिकांचे परीक्षण रंगभूषाकार रवी कुलकर्णी, तंत्रज्ञ सुधीर देवगावकर व गिरीधर पांडे यांनी केले. सादर झालेल्या सहा एकांकिकांमध्ये विषयांसह सादरीकरणातही वैविध्य होते. यात ‘निशाने सवाल’ ही अर्जुन टाकरसलिखित- दिग्दर्शित एकांकिका वृत्तवाहिन्यांवरील गरमागरम चर्चांची ‘आॅफ द रेकॉर्ड’ गोष्ट सांगत होती. चेतन ढवळेच्या ‘उद्घाटन’ या एकांकिकेने एका स्मशानभूमीच्या उद्घाटनावरून रंगलेल्या राजकारणावर खुमासदार शैलीत प्रकाश टाकला. ‘रंगधुंद’ या ज्ञानेश्वर ढवळेच्या एकांकिकेने कलावंताच्या आयुष्यावर भाष्य केले.
स्वप्नील मोरे याने ‘कहर’मधून गेमिंगचे व्यसन लागलेली पिढी, त्याकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले. ‘ती’मधून रविना सुगंधीने हॉस्टेल लाईफमधल्या जगण्याला भयकथेची जोड देत नाट्य आकाराला आणले.