उस्मानाबादकरांची पुन्हा सर्वेक्षणावरच बोळवण...

By Admin | Updated: July 9, 2014 00:29 IST2014-07-09T00:13:11+5:302014-07-09T00:29:54+5:30

उस्मानाबाद : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. मात्र राज्याप्रमाणेच उस्मानाबादकरांचीही या बजेटमधून निराशाच झाली आहे.

Osmanabadkar again talks on the survey ... | उस्मानाबादकरांची पुन्हा सर्वेक्षणावरच बोळवण...

उस्मानाबादकरांची पुन्हा सर्वेक्षणावरच बोळवण...

उस्मानाबाद : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. मात्र राज्याप्रमाणेच उस्मानाबादकरांचीही या बजेटमधून निराशाच झाली आहे. सोलापूर-तुळजापूर या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असले तरी या मार्गाचे यापूर्वी दोन-तीन वेळा सर्वेक्षण झालेले असल्याने यावेळी रेल्वमंत्रालयाने थेट कामासाठी निधीची तरतूद करण्याची आवश्यकता होती, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
उस्मानाबादकरांना रेल्वे अर्थसंकल्पातून घसघशीत असे काहीही मिळालेले नाही. कर्नाटक, महाराष्ट्राला जोडण्यासाठी मदग-पंढरपूर हा रेल्वेमार्ग होणार आहे. त्यामुळे थेट नसला तरी कर्नाटकात जाणाऱ्यांसाठी जिल्ह्यातील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणार असल्याचे अर्थ संकल्पात नमूद करण्यात आले आहे. मात्र केवळ सर्वेक्षणावरच बोळवण झाल्याने रेल्वे प्रवाशात नाराजी आहे. १९७२ साली सोलापूर-तुळजापूर-औरंगाबाद या रेल्वेमार्गाची भाई उद्धवराव पाटील यांनी विधानसभेत सर्व प्रथम मागणी केली होती. त्या अनुषंगाने या मार्गाचे सर्वेक्षण न करता आता थेट निधीची तरतूद करायला हवी होती, असे उस्मानाबादकरांचे म्हणणे आहे.
केंद्राकडून प्रथमच दखल-ठाकूर
फेब्रुवारी २०१२ मध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणीची औरंगाबाद येथे बैठक झाली होती. त्यात मराठवाड्याचा विकास या संदर्भात मी विशेष प्रस्ताव मांडला होता. यात तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचा विषय प्रामुख्याने होता. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीनेही या ठरावाला मंजुरी दिली होती. या बरोबरच गोपीनाथ मुंडे मागील वर्षी तुळजापूर येथे कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी तसेच कळंब येथे लोकसभा निवडणूक काळात झालेल्या सभेतही मुंडे यांनी तुळजापूर रेल्वेने जोडण्यासाठी आग्रही राहू, असा शब्द दिला होता. २५ जुलै रोजी मुंबईत झालेल्या भाजपाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी काय असावे? या अनुषंगाने माहिती संकलित करण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आम्ही शिष्टमंडळाद्वारे १ जुलै रोजी दिल्लीला जाऊन मांडला होता. त्यानुसार केंद्रशासनाने सोलापूर-तुळजापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. यापूर्वी या मार्गाचे सर्वेक्षण झाले असले तरी पूर्वीच्या अर्थसंकल्पात हा विषय कधीच नव्हता. तो यावेळी प्रथमच आला आहे. केंद्र शासनाने या मार्गाचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याने येणाऱ्या काही दिवसात श्री क्षेत्र तुळजापूर रेल्वेने जोडण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
रेल्वे अर्थसंकल्पाने केली घोर निराशा-निपाणीकर
रेल्वे अर्थ संकल्पात महाराष्ट्राप्रमाणेच उस्मानाबादच्या वाट्यालाही काहीही आलेले नाही. सोलापूर-तुळजापूर या रेल्वेमार्गाचे यापूर्वी तीन वेळा सर्वेक्षण झाले आहे. या रेल्वेमार्गासाठी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च असल्याबाबतचा प्रस्ताव दिल्लीत पडून आहे. त्यामुळे यावेळी अर्थसंकल्पात पुन्हा सर्वेक्षण करण्याचे जाहीर करून या भागातील रेल्वे प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केंद्र शासनाने केल्याची प्रतिक्रिया रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य प्रभाकर निपाणीकर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी सदर सर्वेक्षण व आर्थिक तरतुदीच्या प्रस्तावाला मान्यता देऊन कामाची सुरुवात करण्याची घोषणा अपेक्षित होती, असेही त्यांनी सांगितले. १९८९ साली जॉर्ज फर्नांडीस रेल्वे मंत्री असताना देशातील सर्व गेज (नॅरो मीटर) यांना मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच देशातील तीर्थक्षेत्रही एकमेकांना जोडण्याचा निर्णय झालेला होता. अशा स्थितीत पुन्हा सर्वेक्षणाच्या घोषणेची अपेक्षा नव्हती. आपले लोकप्रतिनिधी पाठपुराव्यात कमी पडले, असा आरोपही निपाणीकर यांनी केला. उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर प्रवाशांना गाडीत चढताना अडचणी येतात. तसेच पुरेशा सुविधांचाही अभाव आहे. मुळात या मार्गावर गाड्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता होती. मात्र रेल्वे मार्गावर गाड्या न वाढविता पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय निराशाजनक असल्याचे ते म्हणाले.
तुळजापूरकरांकडून स्वागत
रेल्वे अर्थसंकल्पात सोलापूर-तुळजापूर मार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी मान्य झाल्याचे समजताच तुळजापुरातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी सेना शहराध्यक्ष सुधीर कदम, बाळासाहेब जाधव, दिनेश रसाळ, बापू नाईकवाडी, भाजपाचे सुहास साळुंके, विकास मलबा, गुलचंद व्यवहारे, नागेश नाईक, बाळा शामराज, रिपाइंचे तानाजी कदम, अनंत पांडागळे, शुभम कदम आदी उपस्थित होते.
एकत्रित येण्याची गरज : पाटील
सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करून राज्य शासनाने नेमका किती वाटा उचलावा, हे सांगायला हवे होते. मात्र या मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. उस्मानाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या मार्गावर आणखी एखादी गाडी सुरू करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. भविष्यात उस्मानाबाद जंक्शन होऊ शकते. त्यामुळे या भागाच्या विकासाला वाव मिळू शकतो. या बाबी पाहता राजकीय मतभेद बाजूला सारून रेल्वेप्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Osmanabadkar again talks on the survey ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.