वडार समाजाची अनाथ मुलगी प्रथमश्रेणीत
By Admin | Updated: June 15, 2017 00:15 IST2017-06-15T00:09:38+5:302017-06-15T00:15:09+5:30
बिलोली : कस्तुरबा गांधी विद्यालयात ५ वीला प्रवेश मिळाला़ मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात याच अनाथ मुलीने ६६ टक्के गुण मिळवून प्रथमश्रेणी प्राप्त केली़

वडार समाजाची अनाथ मुलगी प्रथमश्रेणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : जन्मत:च आईवडिलांचे छत्र हरवले़ आजोबांनी पालनपोषण केले़ पुढे बिलोलीच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात ५ वीला प्रवेश मिळाला़ मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात याच अनाथ मुलीने ६६ टक्के गुण मिळवून प्रथमश्रेणी प्राप्त केली़ तिचे यश वाखाणण्याजोगे आहे़
कविता मिरे असे मुलीचे नाव़ या विश्वात कविता येतानाच तिच्या आईचे निधन झाले़ वर्षभरानंतरही वडील दगावले़ राम मिरे (रा़ सगरोळी) असे वडिलांचे नाव़ आईवडिलांचे छत्र हरपलेल्या कविताचे पालनपोषण तिच्या आजोबांनी केले़ घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते पण या गावाहून त्या गावाला भटकंती करून उपजिविका करतात़ पुढे ५ वी ला कविता हिला बिलोलीच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात प्रवेश मिळाला़ आईवडिलांचा चेहरा देखील न पाहिलेल्या कविताने मात्र कस्तुरबा गांधींचा आदर्श घेतल्याचे निकालावरून स्पष्ट होते़ तिने अभ्यासापाठोपाठ चित्रकला, रांगोळी, कराटे स्पर्धेतही विविध पदके मिळविली़
यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष तथा तहसीलदार विनोद गुंडमवार, सचिव तथा गटशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी, मुख्याध्यापिका जी़ आऱ सावळे यांनी तिचे कौतुक केले़