माझ्यासारख्या नटाचं मूळ आणि कूळ रंगभूमीच़़़
By Admin | Updated: February 1, 2015 00:46 IST2015-02-01T00:46:36+5:302015-02-01T00:46:36+5:30
दत्ता थोरे ,लातूर नाटकं केली..मालिका केल्या.. चित्रपट केले.. पण साऱ्यात मला माझी रंगभूमीच प्रिय वाटते. रसिकांकडून सर्वात जलदगतीची दाद ज्याला लाईव्ह रिस्पॉन्स म्हणता येईल

माझ्यासारख्या नटाचं मूळ आणि कूळ रंगभूमीच़़़
दत्ता थोरे ,लातूर
नाटकं केली..मालिका केल्या.. चित्रपट केले.. पण साऱ्यात मला माझी रंगभूमीच प्रिय वाटते. रसिकांकडून सर्वात जलदगतीची दाद ज्याला लाईव्ह रिस्पॉन्स म्हणता येईल तो रंगभूमीतूनच मिळतो. किंबहुना मालिका आणि चित्रपटांपेक्षाही तीच एक परिपूर्ण नट घडविते. त्यामुळे माझ्यासारख्या नटाचं मूळं आणि कुळं ही रंगभूमीच आहे, असे मत ‘कॉमेडी एक्सप्रेस’ फेम अभिनेते कमलाकर सातपुते यांनी मांडले. शुक्रवारी आपल्या लातूर दौऱ्यात ते खास ‘लोकमत’शी बोलत होते.
आपल्या मनसोक्त गप्पांमधून पुढे मुलाखत उलगडताना सातपुते म्हणाले की, मराठवाड्याची भूमी ही कलावंतांची भूमी आहे. वामन केंद्रेंसारख्या कलावंतांनी रंगभूमीची दारे उघडी करुन दिली. आज एकट्या बीड जिल्ह्यातून मी, नंदू माधव, मकरंद अनासपुरे, अरविंद जगताप, संदीप पाठक असे कलाकार पुढे आलो. अजूनही येताहेत. मराठवाड्यात तर प्रत्येक जिल्ह्यातून पुढे आलेल्या कलावंतांनी तर विक्रम केले. मी तर अत्यंत सर्वसाधारण घरातला. घरात पाच भाऊ-बहिणी, आई घरात आणि बाबा एकटे कमावते. अशी स्थिती असतानाही मला माझ्यातला अभिनेता माझ्या गल्लीतच सापडला तो ही विद्यार्थी दशेत. भाऊ कदम, किशोर चौगुले आणि रजनीश असे आम्ही एका गल्लीत रहायचो आणि एकांकिका करायचो. त्यांसाठी आम्ही संस्थाही काढलेली. पण हजारो थिएटर कलावंत घडविणाऱ्या मुंबईच्या रुईया महाविद्यालयाने माझ्यातल्या कलावंताला आकार आणि उकार दिला. या महाविद्यालयाने महाराष्ट्राला संजय नार्वेकर, मनवा नाईक, गजेंद्र अहिरे, क्रांती रेडेकर असले अनेक अस्सल कलावंत दिले. पदवीपर्यंत हीच माझी रंगभूमीची शाळा. पुढे मला एक चालतंबोलतं नाट्य विद्यापीठ भेटलं. संजय नार्वेकर त्याचे नाव. नाटकातला माझा गुरुच भेटला. कॉमेडी कशाशी खातात ? हे कळत नव्हतं तेव्हा यातलं टायमिंग कसं जमवायचं... बॉडीलँग्वेज कशी साधायची.. हे त्याने मला शिकवलं.
खरे तर मी शिक्षण कमी आणि नाटक जास्त शिकलो हे त्यावरच्या प्रेमापोटी. दुसरं काही करण्यापेक्षा मी नाटकात आलो याचा मला जास्त आनंद आहे. मी पोटापाण्यासाठी ओल्ट कस्टमला नोकरीला होतो. नोकरीचे ९० दिवस भरल्यानंतर तिथे एक मुलाखत घेऊन नोकरीत कायम केलं जायचं. ज्या दिवशी मुलाखती होत्या त्या दिवशी माझ्या एकांकिका होती. मी मुलाखत सोडून तिकडे गेलो तो कायमचाच. पहिलं व्यावसायिक नाटक केल, मात्र मला यश मिळवून दिलं ते ‘यदाकदाचित’ने. मी या नाटकात अडीच हजार प्रयोगात ‘धर्म’ चा रोल केला. मी ते एन्जॉय केलं. त्यानंतर वन टू का फोर, तू तू मी मी असे तेरा चौैैदा नाटकं केली. मी माझ्या कोणत्याच कामावर समाधानी नसतो. मी यापेक्षा चांगलं करु शकलो असतो ? असंच वाटतं राहतं. मला वाटतं ही अतृत्पीच माझ्यातला दर्जा वाढवित असावी. चित्रपटात मात्र मी मला आवडलो ‘यांचा काही नेम नाही’ आणि ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’मध्ये. ‘कॉमेडी एक्सप्रेस’ने मला घरा-घरात नेलं. इन्स्पेक्टर कवी आठवून लोक हसतात.
नाटक काय आणि मालिका काय ? यातला विनोदी आणि गंभीर असा भेद करता कामा नये. लोकांना पहायला लावतं ते चांगलं असं म्हणून कलांकडे पहायला हवं. मराठीत ‘यदा कदाचित’ चाललं ‘आॅल दी बेस्ट’ चाललं. तसं ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ आणि ‘पांढरपेशी वेश्या’ही चाललं. सखाराम बार्इंडर, घासीराम कोतवाल यासारखी समाजव्यवस्थेला धक्का देणारी नाटकं आता नसली तरी लोकांना आकर्षित करतील असे गंभीर, विनोदी विषय येत आहेतच. मला ‘पुरुष’मध्ये नाना पाटेकर यांनी रंगवेलेला गुलाबराव रंगवायचे स्वप्न आहे. चप्पलेचा कर्र्कर्र् आवाज आल्यानंतर दोन मिनिटे प्रेक्षकांना श्वास रोखायला लावून रंगमंचावर येणारा गुलाबराव हा माझा ड्रिम रोल आहे.