दुष्काळावर मात करण्यासाठी संस्था सरसावल्या
By Admin | Updated: April 21, 2016 00:40 IST2016-04-21T00:09:43+5:302016-04-21T00:40:58+5:30
औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत.

दुष्काळावर मात करण्यासाठी संस्था सरसावल्या
औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत. सिद्धीविनायक मंदिर, साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळ यासह इतरही काही संस्थांनी स्वत:च्या खर्चातून जलसंधारणाची कामे करून देण्यासाठी पुढे आल्या आहेत. या संस्थांनी कामे करण्यासाठी काही गावे निवडली असून, काही ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरुवातही झाली आहे.
सलग चार वर्षांपासून जिल्ह्यास दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यंदाही जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. महिला आणि मुलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व वाढले आहे. अशी कामे करून देण्यास अनेक संस्था पुढे आल्या आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे सुरू आहेत, पण आता त्यासोबतच सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट (मुंबई), साईबाबा मंदिर ट्रस्ट (शिर्डी), तसेच इतर काही खाजगी संस्थांही जलसंधारणाची कामे करीत
आहेत.
सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून गंगापूर तालुक्यातील गाजगाव, वैजापूर तालुक्यातील तलवाडा आणि भगूर या गावांमध्ये शेततळे, नाला खोलीकरण, गाळ काढणे यासारखी कामे केली जाणार आहेत. तसेच साईबाबा मंदिर ट्रस्टही औरंगाबाद तालुक्यातील लायगाव, सिल्लोड तालुक्यातील वरूड खुर्द आणि कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथे नाला खोलीकरण, गाळ काढण्याची कामे करणार आहेत. आरसीएफकडूनही सीएसआरअंतर्गत कणकशील (ता.खुलताबाद) येथे मोठ्या प्रमाणावर कामे केली जाणार आहेत.