उडीद, तुरीचा पेरा घटणार
By Admin | Updated: May 30, 2014 00:24 IST2014-05-29T23:37:34+5:302014-05-30T00:24:37+5:30
लातूर : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याचा आणि तूर आणि उडीदाचा पेरा घटण्याची अपेक्षा कृषी विभागाने वर्तविली आहे़

उडीद, तुरीचा पेरा घटणार
लातूर : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याचा आणि तूर आणि उडीदाचा पेरा घटण्याची अपेक्षा कृषी विभागाने वर्तविली आहे़ मागणीच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे कमी उपलब्ध झाले असल्याने निम्म्यापेक्षा जास्त शेतकर्यांना घरगुती बियाणांचा पेरा करावा लागणार आहे़ मृग नक्षत्र सुरु होण्यास अवघ्या एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे़ त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत़ नांगरणी, मोगडणे, वेचणे अशी कामे जोरात सुरु आहेत़ सध्या उन्हाचे तीव्र चटके बसत असल्याने शेतीकामात व्यत्यय येत आहे़ त्यामुळे शेतकरी आणि शेत मजूर सकाळच्या वेळी आणि दुपारी ३ च्यानंतर शेतातील कामे करीत आहेत़ त्याचबरोबर काही शेतकरी घरगुती बी- बियाणांची चौकशी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ६ लाख ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरा प्रस्तावित आहे़ त्यात सोयाबीनचा पेरा ३ लाख ५५ हजार हेक्टर, ज्वारी ४७ हजार हेक्टर, तूर ९३ हजार हेक्टर, मूग १६ हजार हेक्टर, उडीद २२ हजार हेक्टर, कपाशीचा पेरा ५ हजार हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित आहे़ ऊसाची ४१ हजार हेक्टर्स क्षेत्रावर लावण होईल असे गृहित धरण्यात आले़ यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होणार असून त्यापाठोपाठ तूरीचा पेरा होईल़ सोयाबीन वगळता इतर सर्व पिकांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत़ ३ लाख ५५ हजार हेक्टर्स क्षेत्रासाठी २ लाख ३१ हजार क्विं़ सोयाबीनच्या बियाणाची आवश्यकता आहे़ त्याच्या तुलनेत महाबीजचे १५ हजार क्विं़, खाजगी कंपन्यांचे ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे़ उर्वरित १ लाख ७९ हजार क्विं़ बियाणे घरगुती वापरावे लागणार आहे़ नगदी पीक म्हणून शेतकर्यांचा ओढा सोयाबीनकडे वाढला आहे़ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचा पेरा २० हजार हेक्टर्स क्षेत्रावर वाढण्याची अपेक्षा आहे़ उडीदाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे़ त्याचबरोबर यंदा तूरीच्या ५० हजार हेक्टर्स क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे़ ऊसाचे क्षेत्रही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ (प्रतिनिधी) मुबलक खत... भरारी पथके़़़ यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाकडे १ लाख १६ हजार ३८ मे़ टन खताची मागणी करण्यात आली होती़ त्यापैकी ९३ हजार ६०० मे़ टन खत मंजूर झाला आहे़ यात युरिया ३५ हजार १०० मे़ टन, डीएपी १५ हजार २०० मे़ टन, एसएसपी १७ हजार ३०० मे़ टन मंजूर झाले आहे़ गेल्यावर्षी २५ हजार मे़ टन खत शिल्लक आहे़ जिल्ह्यातील शेतकर्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळावे तसेच बियाणांची कृत्रिम टंचाई होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १३ भरारी पथकांची स्थापना केली आहे़ प्रत्येक तालुकास्तरावर एक, उपविभाग स्तरावर एक आणि जिल्हास्तरावर एक असे भरारी पथक आहे़ शेतकर्यांची आर्थिक लूट करणार्या विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे़