अधीक्षकांच्या पथकाच्याच कारवाया, स्थानिक पोलीस गप्प
By Admin | Updated: December 9, 2015 00:42 IST2015-12-09T00:18:59+5:302015-12-09T00:42:00+5:30
शिरीष शिंदे , बीड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या पथकाद्वारे जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाया सुरु आहेत. या कारवायामुळे ज्या ठिकाणी कारवाई होत आहे

अधीक्षकांच्या पथकाच्याच कारवाया, स्थानिक पोलीस गप्प
शिरीष शिंदे , बीड
पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या पथकाद्वारे जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाया सुरु आहेत. या कारवायामुळे ज्या ठिकाणी कारवाई होत आहे त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील अवैध धंदे कसे बोकाळले आहेत, याची उत्तम उदाहरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. पथकाच्या उत्कृष्ट कारवाईमुळे आणखी पथकांची स्थापना करावी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली बीड व अंबाजोगाई येथे विशेष पथके स्थापन केलेली आहेत. पथक स्थापन करण्याच्या दोन महिन्यांपुर्वी अधीक्षक पारस्कर यांनी सर्व ठाणे प्रमुखांना त्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेले मटका, जुगार, अवैध लॉटरी आदी उद्योग सुरु राहिले तर ठाणे प्रमुखांसह बीट अंमलदारावर कारवाई करणार असल्याची तंबीही त्यावेळी देण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांनाच आव्हाण देणारी धंदे सुरु होती. पथक स्थापन केल्यानंतर पथकाने पहिल्या दोन महिन्यात लहान मोठ्या कारवाया केल्या मात्र त्यानंतर मोठ्या कारवायांना सुरुवात केली. पहिली मोठी कारवाई नेकनुर पोलीस ठाणा हद्दीत केली गेली.
चौसाळा नजीक असलेल्या एका शेतमधील शेडमध्ये ५२ लाख रुपयांचा गुटखा पकडला होता. त्यानंतर दुसरी मोठी कारवाई बीउ शहरात दिवाळच्या पूर्वी करण्यात आली होती. प्रमाणापेक्षा फटाक्यांच्या अधिकसाठा ठेवण्यात आला होता. तब्बल ८० लाख रुपयांच्या शोभेच्या दारुच्या घरास पोलिसांनी सील केले होते. या प्रकरणी आठजणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्या पाठोपाठ अंबाजोगाईतही पोलीस अधीक्षकांच्या दुसऱ्या पथकाने कारवाई करत जवळपास ६० लाख लाखांचे फटाके प्रमाणापेक्षा अधिक साठवणूक केल्याने सील करुन फटाके व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.अंबाजोगाई शहरातून राशनचा तांदुळ काळ्या बाजारात नेणारा ट्रक पथकाने जप्त केला होता. तसेच बीड शहरानजीक एका एसी गोदामात गोमांस ठेवले असल्याच्या माहितीवरुन कारवाई करुन ते गोदाम बंद करण्यात आले होते. या मोठ्या कारवायांमुळे अवैध धंद्यावाल्यांची धाबे दणाणली होती.
शहरात गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत मटका चालकांवर विशेष पथकाने कारवाई केली आहे. पथकांच्यावतीने वारंवार कारवाई केली जात असल्याने मुख्य मटका चालक अंडरग्राऊंड झाले होते मात्र त्यांचे धंद बंद झाले नव्हते. कारवायाची थंडावल्या नव्हत्या, आजही पथकाच्या कारवाया सुरुच आहेत. पथक कारवाई करीत असल्याने जुगाऱ्यांनी रात्रीच्यावेळी पत्ते खेळणे सुरु केले होते मात्र त्यांच्यावरही पथकाने कारवाई केली आहे. वरील सर्व घटनांचा आढावा घेतला व स्थानिक पोलिसांची त्याच्याशी तुलना केली तर तफावत आढळून येते. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे का बोकाळले आहेत याचे विस्तृत वर्णन करण्याची गरज नाही. परिणामी पथका त्यांच्यापेक्षा सक्षम असल्याचे सर्व सामान्यांना वाटत आहे.