सज्जांची कार्यालये फक्त नावालाच

By Admin | Updated: July 6, 2014 00:24 IST2014-07-06T00:01:30+5:302014-07-06T00:24:32+5:30

उस्मानाबाद : ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय ‘लोकमत’ने जिल्ह्यातील काही तलाठी सज्जाच्या ठिकाणी शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान निदर्शनास आला.

Only the names of the ready-made offices | सज्जांची कार्यालये फक्त नावालाच

सज्जांची कार्यालये फक्त नावालाच

उस्मानाबाद : ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय ‘लोकमत’ने जिल्ह्यातील काही तलाठी सज्जाच्या ठिकाणी शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान निदर्शनास आला. अनेक सज्जाच्या तलाठ्यांकडे एकापेक्षा अधिक सज्जांची तर काहींकडे तहसीलमधील टेबल सांभाळण्याचीही जबाबदारी देण्यात आली असल्यामुळे हे तलाठी आपल्या सोयीप्रमाणे कधी सज्जावर जाऊन तर कधी तालुक्याच्या ठिकाणी बसून नागरिकांची कामे करीत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तलाठी कार्यालये उभारली असली तरी वापराअभावी ती धूळ खात पडून आहेत. त्याचा वापर अवैध धंद्यासाठी होत असल्याचेही धक्कादायक चित्र समोर आले. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे बहुतांश तलाठ्यांनी सज्जाच्या ठिकाणी खाजगी सहकारी नियुक्त केला असून, त्यांच्यामार्फतच बहुतांश कामकाज केले जात असल्याचेही या पाहणीदरम्यान समोर आले. एकूणच जिल्ह्यात सज्जे जास्त आणि तलाठ्यांची संख्या कमी असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरून ग्रामस्थांची होणारी हेळसांड थांबविण्याची गरज यावेळी प्रकर्षाने दिसून आली.
राहुल डोके ल्ल पारगाव
वाशी तालुक्यातील पारगाव येथून जवळच असलेल्या हातोला या तलाठी सज्जाला भेट दिली असता या गावचे तलाठी फक्त रविवारीच गावात येऊन नागरिकांची कामे करीत असल्याचे समोर आले. खुद्द तलाठ्यांनीही याची कबुली देत ‘माझ्याकडे तहसील कार्यालयातीलही एका टेबलची जबाबदारी असल्याचे सांगितले.
या सज्जांतर्गत हातोला, पांगरी, जेबा, ब्रम्हगाव ही गावे येतात. या सज्जासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तलाठ्याकडे वाशी आणि हातोला या दोन गावांचा कारभार आहे. याशिवाय तहसील कार्यालयातील जमाबंदीचा टेबलही त्यांनाच पहावा लागत असल्याने ते केवळ रविवारीच येथे येऊन नागरिकांची कामे करतात. इतर वेळी नागरिकांना वाशीला जाऊन तलाठ्यांची भेट घ्यावी लागते. याबाबत संबंधित तलाठ्याशीच संपर्क साधला अतसा ‘मी गेल्या रविवारी आलो होतो व पुढच्या रविवारीही येणार आहे. माझ्याकडे वाशी आणि हातोला असे दोन सज्जे असून, वाशीमध्ये वाशी, केळेवाडी, कवडेवाडी तर हातोला सज्जामध्ये हातोला, जेबा, पांगरी, ब्रम्हगाव अशा एकूण सात गावांचा कारभार मला पहावा लागतो. याशिवाय वाशी तहसील कार्यालयातील जमाबंदीचा टेबलही माझ्याकडेच आहे. त्यामुळे वाशी किंवा हातोला सज्जातील नागरिकांना लागणारी कागदपत्रे मी वाशी येथूनच देतो. तसेच हातोला येथे रविवारी येऊन काम करतो,’ असे सांगितले.
तलाठ्याची
ओळखच नाही !
दत्ता गायके ल्ल येरमाळा
शासनाने गाव तेथे तलाठी व त्यांचे राहते घरच तलाठी कार्यालय अशी घोषणा केली. परंतु ही घोषणा हवेतच विरली असून, सज्जाच्या ठिकाणी कुठलाही तलाठी राहत नाही. उलटपक्षी कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात खेटे मारावे लागतात. कळंब तालुक्यातील सापनाई येथेही हाच अनुभव आला. रत्नापूर, उमरा, परतापूर या सज्जाचा तलाठी नेमका कोण आहे, हे अनेक गावकऱ्यांना माहितच नाही. तेथील तलाठ्याने ठेवलेल्या कामगारांवरच या सज्जाचा कारभार चालत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तलाठी हा गाव महसुली कारभाराचा शासनाचा मुख्य दुवा असतो. परंतु शासन ही बाब गांभिर्याने घेत नसल्याचे शिवाजी जाधवर यावेळी म्हणाले.
तलाठी कधी भेटतील, याचा नेम नाही !
दत्ता नांगरे ल्ल बलसूर
उमरगा तालुक्यातील बलसूर येथील तलाठी कार्यालयाला प्रतिनिधीने भेट दिली असता हे कार्यालय चक्क कुलूपबंद असल्याचे व कार्यालयाबाहेर नागरिक तलाठी साहेबांची वाट पाहत असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांना विचारले असता तलाठी कधी भेटतील, याचा नेम नाही. त्यामुळे सकाळपासूनच त्यांची वाट पाहत थांबल्याचे सांगितले.
सध्या पीककर्ज घेण्यासाठी पिकपेरा, कागदपत्रासाठी तसेव शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्पन्नाचे दाखले व इतर कागदपत्रांसाठी धावपळ सुरू आहे. येथील तलाठ्याकडे बलसूल, व्हंताळ, रामपूर आदी गावांचा कारभार आहे. त्यांचे कार्यालय बलसूर येथे असले तरी कार्यालयास भेट दिली त्यावेळी मात्र ते बंद असल्याचेच समोर आले.
खाजगी सहायकच बनले कारभारी
बालाजी बिराजदार ल्ल लोहारा
तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालयात खासगी सहायकच तलाठ्यांची कामे करीत असून, अनेक ठिकाणच्या नागरिकांना खरा तलाठी कोण याची माहिती नाही़ विविध प्रमाणपत्रासाठी तलाठी कार्यालयात गर्दी करणाऱ्या नागरिकांची मात्र, आर्थिक लूट होत असल्याचेही काही ठिकाणी दिसून आले.
लोहारा तालुक्यात तीन मंडळ व १७ सज्जे आहेत़ यासाठी १४ तलाठी कार्यरत आहेत़ मात्र, १४ पैकी पाच तलाठी तहसील कार्यालयातील वेगवेगळी कामे करून आपला सज्जा संभाळत असल्याचे तर बऱ्याच तलाठ्यांकडे दोन-दोन सज्जांचा कारभार देण्यात आल्याचेही समोर आले. उंडरगाव, मार्डी येथील सज्जाच्या तलाठ्यांनी तर लोहाऱ्यातच कार्यालये थाटली असून, अनेक तलाठी कार्यालयात त्यांचा खासगी सहाय्यक विश्वासू म्हणून कामकाज पाहतो़ तलाठ्यांच्या अनुपस्थितीत हेच ‘साहेब’ असतात़ तलाठ्यांनी कोऱ्या कागदावर स्वाक्षरी केलेली असते. त्यामुळे विविध प्रमाणपत्रे ‘दाम’ दिल्यानंतर सर्वसामान्यांना खासगी ‘तलाठी’ देतात़ विशेषत: कमी उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी मोठा व्यवहार करण्याची वेळ सर्वसामान्यांवर येत असल्याचेही काही नागरिकांनी सांगितले. तसेच आमच्याकडे अतिरिक्त सज्जाचा पदभार असल्याने नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून खासगी सहायक कामाला ठेवल्याची कबुलीही काही तलाठ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आष्टामोडहून दस्तापूरचा कारभार
देविसिंग राजपूत ल्ल येणेगूर
तलाठी कार्यालये (सज्जा) हे महसुली खात्याचे उगमस्थान मानले जाते. शासनाने प्रत्येक चार गावासाठी एक तलाठी सज्जा निर्माण केला आहे. तेथे जनतेच्या सोयीसाठी वेगवेगळे दाखले ज्यामध्ये सातबारा, ८ अ, उत्पन्न, रहिवासी, निराधार आदीसह गावातील शेतीचे अद्ययावत नोंदणी करण्याचे संकेत असताना लोहारा तालुक्यातील दस्तापूर गावचा कारभार मात्र आष्टामोड येथील कार्यालयातून हाकला जात असल्याचे दिसून आले. दस्तापूर हा सज्जा दस्तापूर, भोसगा, कोळनूर, पांढरी गावासाठी निर्माण करण्यात आला आहे. मात्र, येथील तत्कालीन तलाठी नळेगावकर यांच्या बदलीनंतर या सज्जास कायमस्वरुपी तलाठी नसल्यामुळे या तीनही गावच्या नागरिकांना कार्यालयीन कामकाजासाठी दररोज हेलपाटे घालावे लागत आहेत. या सज्जाचा तात्पुरता पदभार अचलेरच्या तलाठ्याकडे असल्याने हा तलाठी वेळेच्या वेळी येत नसल्यामुळे विविध दाखल्यासाठी दिवसभर तलाठ्याची वाट पहावी लागत आहे. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष चालू झाले आहे. पालकांना वेगवेगळ्या दाखल्यासाठी येथील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. पण तलाठी वेळेवर येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
सुसज्ज कार्यालय धूळ खात !
संतोष मगर ल्ल तामलवाडी
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथे तलाठ्यांना व्यवस्थित कामकाज करता यावे यासाठी महसूल प्रशासनाने गाव तिथे तलाठी कार्यालय योजनेअंतर्गत तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. याला आता सहा महिन्याचा कालावधी लोटत आला तरी या इमारतीचा वापर सध्या अवैध धंद्यांसाठी होत असल्याचे दिसून आले.
सांगवी (काटी), पांगरधरवाडी या दोन गावचा सज्जा एक आहे. तलाठी सज्जावर मुक्कामी राहून शेतकऱ्यांच्या समस्या, विविध प्रमाणपत्र मिळावीत या उद्देशाने सांगवी (काटी) येथे ९ लाख रुपये खर्चून ही इमारत उभारण्यात आली. इमारत उभी राहून सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, आजघडीला ही वास्तू वापराविना धूळ खात पडून आहे. येथील सज्जास गेल्या दोन महिन्यापासून कायम तलाठी नसल्याने येथील पदभार दुसऱ्या तलाठ्याकडे जोडण्यात आला आहे. तेही फक्त गारपीटग्रस्त अनुदान यादी वाचनासाठी गावात आले होते. नंतर एकही तलाठी इकडे फिरकले नाहीत, असे काही ग्रामस्थांनी सांगितले.
सध्या सातबारा उतारा सेतूमधून घेऊन काम भागवत असलो तरी डिक्लेरेशन फॉर्म मिळत नसल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे, बांधकाम पूर्ण झाले तरी या तलाठी कार्यालयाचे उद्घाटन झाले नसल्याचेही यावेळी ग्रामस्थांकडून समजले. सध्या एका भाड्याच्या खोलीत सांगवी (काटी) येथील तलाठी कार्यालय सुरु असून, तलाठी गावातच येत नसल्याने त्यांच्या भेटीचे वार समजत नाहीत. त्यामुळे अनेक कामे रखडतात, असेही काही शेतकरी म्हणाले.

Web Title: Only the names of the ready-made offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.