गारपीटग्रस्त शेतकर्यांना केवळ ८० रुपयांची मदत
By Admin | Updated: May 21, 2014 00:48 IST2014-05-21T00:35:24+5:302014-05-21T00:48:23+5:30
निवघा बाजार : फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे परिसरातील शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झाले़

गारपीटग्रस्त शेतकर्यांना केवळ ८० रुपयांची मदत
निवघा बाजार : फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे परिसरातील शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झाले़ नुकसान भरपाई म्हणून काही जणांच्या नावे केवळ ८० रुपये मंजूर झाल्याचे समोर आले आहे़ महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतीचे व पिकांचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठांना पाठविला़ त्याप्रमाणे शेतकर्यांना निवघा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुदानाचे पहिल्या व दुसर्या टप्प्याचे वाटप सुरू आहे़ अनुदानाच्या याद्या बँकेत व त्या-त्या गावात प्रसिद्ध झाल्या़ या यादीनुसार धानोरा (रूई) ता़ हदगाव येथील शेतकर्यांना त्यांच्या नावे चार एकर तर कोणाच्या नावे दोन एकर जमीन आहे़ अशांना केवळ ८० रुपयांची मदत मिळाली आहे़ तर काहींना भरमसाठ अनुदानाची रक्कम मिळाली़ गारपिटीने खरोखर ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले अशांना अनुदान मिळाले नाही़ तर काही शेतकर्यांचे काहीच नुकसान झाले नाही अशांचे नाव यादीत असल्याने संताप व्यक्त होत आहे़ तर तिसर्या टप्प्याचे अनुदान अद्याप वाटपच झाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़ शासनाचे अनुदान फुकट मिळत आहे, यामुळे तक्रार करण्यात कोणी फारसे स्वारस्य दाखवत नाही़ (वार्ताहर)