केवळ ३८४६ मजूर उपस्थिती
By Admin | Updated: December 15, 2015 23:32 IST2015-12-15T23:27:41+5:302015-12-15T23:32:12+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर कोणत्याही परिस्थितीत न होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची बैठक घेत सूचना दिल्या.

केवळ ३८४६ मजूर उपस्थिती
हिंगोली : जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर कोणत्याही परिस्थितीत न होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची बैठक घेत सूचना दिल्या. तर नव्याने कामे सुरू करून मजूर उपस्थिती वाढण्यासाठी जागृती करण्यास सांगण्यात आले. सध्या ८0 कामांवर केवळ ३८४६ मजूर आहेत.
जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या उपस्थितीतील या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, प्रभारी सीईओ विलास जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी पवार, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह तहसीलदार, बीडीओ आदींची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोतील मजूर उपस्थिती मागील वर्षी दुष्काळ असतानाही कमी झाली होती. यंदाही तीच परिस्थिती असताना मजूर कामावर नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी कामे सुरू होत नसल्याची अडचण असली तरी बहुतांश ठिकाणी अपुऱ्या मजुरीमुळे मजूरच बाहेरगावी कामाला जाणे पसंत करीत आहेत. सध्या औंढ्यात १६ कामांवर ३४३, वसमतला ४ कामांवर ६५, हिंगोलीत २७ कामांवर २३७१, कळमनुरीत १२ कामांवर ३१४, सेनगावात २१ कामांवर ७५३ मजूर आहेत.
जिल्ह्यात यापूर्वी मग्रारोहयोत सुरू करण्यात आलेल्या कामांपैकी सिंचनाच्या कामांना प्राधान्य देवून ही कामे पूर्ण करण्यासही बजावण्यात आले आहे. यामध्ये ९४७ सिंचन विहिरी तर १९0 शेततळे रखडलेले आहेत. येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण होतील, असे नियोजन करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
नवीन कामे उपलब्ध करून देण्यासाठी केवळ कागदोपत्री अहवाल न देता प्रत्यक्षात फिल्डवर जावून त्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. तर येत्या पंधरा दिवसांत या पद्धतीने नवीन कामे सुरू करून त्याचा अहवाल छायाचित्रासह सादर करण्यास सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)