मुखेड तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पाऊस
By Admin | Updated: July 23, 2014 00:23 IST2014-07-23T00:02:19+5:302014-07-23T00:23:08+5:30
किशोरसिंह चौव्हाण, मुखेड यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मुखेड तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पाऊस
किशोरसिंह चौव्हाण, मुखेड
यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
इतर तालुक्यांच्या तुलनेत मुखेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.मागील १५ वर्षांच्या काळात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सागवान, चंदन, शिंदी, लिंब, बाभूळ आदी झाडांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्याने तेवढीच कत्तल तालुक्यात सुरु आहे. तालुक्यात एकमेव लेंडी नदी वाहते. या नदीवर धरण बांधण्याचे काम मागील तीस वर्षांपासून सुरु आहे. धरण अर्धवट अवस्थेत आहे. तालुक्यात कुंद्राळा, तामखेड, चांडोळा आदींसह १० ते १५ लघु तलाव आहेत. या तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यात ७६ हजार ८०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, ८ हजार सिंचनेक्षत्र आहे. दरवर्षी जून महिन्यात पाऊस झाला की, पेरण्यांची लगबग सुरु होते. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. १० जुलै २०१४ रोजी तालुक्यातील मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, जांब, मुखेड या भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. पुढे पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती, मात्र झाले उलटेच. पाऊसच आला नाही.
१० जुलैच्या पावसाने तालुक्यात ३० टक्के पेरणी पूर्ण झाली. २९.९७ हेक्टरवर ज्वारी, ४ हजार २६४ हेक्टरवर सोयाबीन, १ हजार ७६७ हेक्टरवर कापूस, १३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उडीद, १ हजार ३४४ हेक्टरवर मुग, ८ हेक्टरवर बाजरी, १३ हेक्टरवर मका एवढी पेरणी तालुक्यात झाली.
पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात ८८ हजार ३०७ जनावरांची संख्या असून, ३३ हजार ५१० जनावरे आहेत. ५४ हजार ७९७ मोठी जनावरे आहेत. चार महिन्यांत गतवर्षीपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी जनावरांची संख्या घटल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. या जनावरांना दरमहा १२ हजार ८७० मेट्रीक टन चारा लागणार आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास डिसेंबर २०१४ पर्यंत २ लाख ५७ हजार ४०० मे. टन चारा लागणार आह तर ३१ मे २०१५ पर्यंत ५ लाख १४ हजार ८०० मेट्रीक टन चारा लागेल. सध्या तालुक्यात २१ जुलैपर्यंत ३४ हजार ४५३ मे.टन चारा शिल्लक आहे. हा चारा ८० दिवस पुरेल. यंदा जनावरांच्या चाऱ्यासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल, मागील वर्षी ज्वारीचा पेरा अल्प झाल्याने शेतकऱ्यांकडे ज्वारी शिल्लक राहिली नाही. वाडी-तांड्यावर १५ जुलैपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्यातील ३० गावे, २१ वाडी ताड्यांना १२ टँकरने पाणीपुरवठा केला जातो.
७६ विहीर, बोअर अधिग्रहण करुन वाडी- तांड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जाणकार आणि जुन्या पिढीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अशीच स्थिती १९७२ मध्ये निर्माण झाली होती.
मागील ११ वर्षांतील पाऊस
२००४ मध्ये ९०२ मि.मी, २००५ मध्ये ९०० मि.मी, २००६ मध्ये ८१० मि.मी., २००७-०८ मध्ये ६७९, २००८ मध्ये ६३५, २००९ मध्ये ३८९, २०१० - ८८६, २०११- ७४२, २०१२-५९४, २०१३-१०५१ आणि २० जुलैपर्यंत २०१४ पर्यंत केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद तालुक्यात झाली. पेरणीचे दिवस संपले आहेत. आता तर उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस आदी पिकेही येणे अवघड आहे तर मागील ११ वर्षांत २१ जुलैपर्यंत २००४-२०२ मि.मी, २००५-३०३, २००६-१३२, २००७-१५५, २००८-१२६, २००९-८६, २०१०-२४०, २०११-२४६, २०१२-२८९, २०१३-४८१ पाऊस झाला होता.