आॅनलाईन तक्रारीत जिल्हाधिकारी कार्यालय टॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 00:04 IST2016-05-09T00:02:27+5:302016-05-09T00:04:50+5:30
औरंगाबाद : शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या आॅनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक ३१३ तक्रारी आल्या.

आॅनलाईन तक्रारीत जिल्हाधिकारी कार्यालय टॉप
औरंगाबाद : शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या आॅनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक ३१३ तक्रारी आल्या. प्रशासन नावाचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात उरला नसल्यामुळे नागरिकांना सेवा-सुविधा मिळणे अवघड झाल्याचा हा पुरावा आहे. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ८२३ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ४०० तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात होत्या.
सरकार दरबारी केलेल्या तक्रारींची वेळेत दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला होता. लालफितीचे चटके सहन करून थकलेल्या सामान्य नागरिकाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यांची आर्थिककुवत जेमतेम आहे. त्यांना गप्प राहण्याशिवाय पर्याय नसतो. हे पारंपरिक चित्र बदलण्यासाठी लोकांनी केलेल्या तक्रारींची थेट सरकार दरबारी दखल घेण्यासाठी शासनाने सुरूकेलेले ‘आपले सरकार’ हे आॅनलाईन पोर्टल लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांबाबतीत तक्रारींचा वर्षाव सुरू झाला आहे.
राज्य शासनाने १५ आॅगस्ट २०१५ पासून हे पोर्टल सुरू केले. त्यावर आतापर्यंत जिल्ह्यातून विविध खात्यांच्या संदर्भातील ७६३ लोकांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यापैकी ६४० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात ३१३ तक्रारी आल्या. त्यातील २६१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
आॅनलाईन तक्रार नोंदविता येते. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेणे अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात असलेल्या तक्रारी प्रथम निवासी उपजिल्हाधिकारी हाताळतात.‘आपले सरकार’च्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रे देण्याचीही सोय आहे. नागरिक इंटरनेटवरून अर्ज करू शकतात.
लोकांनी योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांनी केले आहे.