कांदा @ ६०; सर्वसामान्य त्रस्त
By Admin | Updated: August 23, 2015 23:48 IST2015-08-23T23:27:18+5:302015-08-23T23:48:29+5:30
बीड : दुष्काळामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट आले आहे. परिणामी, महागाई वाढत चालली आहे.त्यातच कांदा प्रतिकिलो ६० रूपयांवर जाऊन पोहोचला

कांदा @ ६०; सर्वसामान्य त्रस्त
बीड : दुष्काळामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट आले आहे. परिणामी, महागाई वाढत चालली आहे.त्यातच कांदा प्रतिकिलो ६० रूपयांवर जाऊन पोहोचला असल्याने सर्वसामान्यांच्या आठवडी बाजाराचे बजेट कोलमडले आहे. पाऊस चांगला न झाल्यामुळे नवीन कांद्याची लागवड झाली नसल्यामुळे कांदाचाळीतील कांदा बाजारात विक्रीस दाखल होत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये नगर व राहुरी या भागातून थोड्या प्रमाणावर कांद्याची आवक होते. बाहेरील जिल्ह्यातून फारसा कांदा बीडमध्ये येत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीत राखून ठेवलेला कांदा बाजारात विक्रीस येतो. यंदा पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे नवीन कांदा लागवड झाली नाही. जुनाच कांदा सध्या बाजारात दाखल होत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बाजारात २० ते २५ क्ंिवटल कांदा प्रतिदिन येत होता. मात्र, आता हाच कांदा प्रतिदिन ७ ते ८ टनावर जाऊन पोहोचला आहे. एवढी कमी आवक होत असल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत कांदा १५ ते २० रूपये विक्री केला जायचा. आॅगस्टच्या सुरूवातीला कांद्याचे भाव ३० रूपये होते तर आता कांदा थेट ५० ते ६० रूपयांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
भाववाढ झाल्यामुळे अत्यल्प प्रमाणात कांद्याची खरेदी अल्प प्रमाणात महिलांकडून होत आहे. व्यावसायिकांनीही कांद्याकडे थोडीशी डोळेझाक केली आहे. परंतु त्यांना कांदा वापरल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक वर्षी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात कांद्याच्या भावात मोठा बदल होतो. मात्र, यावर्षी आॅगस्ट महिन्यातच कांद्याचे भाव वाढलेले आहेत. नोव्हेंबर ते मार्चच्या कालावधीत नवीन कांदा लागवड होतो. त्यानंतर उत्पादित होणाऱ्या कांद्याची साठवणूक केली जाते. मात्र, यंदा परिस्थिती बिकट आहे. जून महिन्यातही पाऊस झालेला नाही आणि सद्य स्थितीलाही पाऊस नाही. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाला तर पुढील कालावधीत नवीन कांद्याची लागवड होईल. जर पाऊस नाही झाला तर कांद्याच्या किंमती कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
गतवर्षी ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी कांदा लागवड झाली व त्यांनी कांदा साठवूण ठेवला. कांदाचाळीत ठेवलेला कांदा बाजारात विक्रीस दाखल होत आहे. परंतु आता बाहेर राज्य व देशातून कांदा येणार असल्यामुळे कांद्यांच्या किंमती कमी होतील, अशी शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.
४जून महिन्यापासून पाऊस न पडल्यामुळे पहिले पीक हातचे गेले आहे. त्यामुळे आता याच कांद्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी जवळपास निर्भर आहेत. मात्र, त्यांची ही आशा फोल ठरते का ? हे पुढे समजेल.
जुना कांदा बाजारात येत आहे. आवक घटल्यामुळे भाव वाढले आहेत. बाहेर देशातून कांद्याची आवक केली जात आहे. तसेच बाहेर राज्यातील कांदा महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्याच्या कालावधीत कांद्याच्या किंमती कमी होऊ शकतात.
- हाफीज बागवान, आडत व्यापारी