दीड वर्षानंतर अनुदानाला मुहुर्त !
By Admin | Updated: December 19, 2014 00:56 IST2014-12-19T00:44:30+5:302014-12-19T00:56:04+5:30
उस्मानाबाद : जिल्हाभरातील अनेक जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत आले होते.

दीड वर्षानंतर अनुदानाला मुहुर्त !
उस्मानाबाद : जिल्हाभरातील अनेक जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत आले होते. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना वीस दिवसांत अनुदान द्या, असे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी करीत कृषी विभागाकडून अनुदान वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. आजवर ४० ते ४५ शेतकऱ्यांना १ लाख ३० हजाराप्रमाणे अनुदान वितरित केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
वर्षागणिक पॉलीहाऊची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या जिल्हाभरात ११० पॉलीहाऊस असून त्यापैकी जवळपास ८० पॉलीहाऊसमध्ये जरबेराची लागवड करण्यात आली आहे. असे असतानाच दुसरीकडे लागवड अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करूनही शासनाकडून जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकले नव्हते. याबाबत वारंवार पाठुपरावा करूनही केवळ आश्वासने मिळत होती. दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे हे दुष्काळ पाहणीसाठी जिल्ह्यात आले असता पॉलीहाऊस जिल्हा असोसिएशन व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी त्यांची भेट घेवून व्यथा मांडली होती. अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल घेत एकनाथ खडसे यांनी अधीक्षक कृषी अधिकारी यांना सदरील अनुदान तातडीने वाटप करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर कृषी विभागाने तातडीची पाऊले उचलून अवघ्या २० ते २१ दिवसांत अनुदान वाटप करण्यास सुरूवात केली आहे. आजवर प्रस्ताव दाखल केलेल्या चाळीस ते पंचेचाळीस जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. मागील एक ते दीड वर्षांपासूनचा हा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)