दीड लाख रोपे करपली!
By Admin | Updated: June 22, 2014 00:07 IST2014-06-21T23:59:10+5:302014-06-22T00:07:12+5:30
अरूण देशमुख, भूम बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने शतकोटी वृक्षलागवड हा उपक्रम हाती घेतला.

दीड लाख रोपे करपली!
अरूण देशमुख, भूम
बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने शतकोटी वृक्षलागवड हा उपक्रम हाती घेतला. मात्र जिल्ह्यापुरता विचार करता या उपक्रमाचा निव्वळ फज्जा उडाला आहे. गतवर्षी तब्बल १ लाख ६४ हजार रोपांची लागवड केली होती. मात्र वर्षाअखेर केवळ १० टक्के म्हणजेच १६ हजार रोपे जगली, असे प्रशासनाच्या दफ्तरी नमूद आहे. त्यामुळे तब्बल दीड लाख रोपे करपली आहेत.
शतकोटी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायती, शाळा, शासकीय जागा आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली जात आहे. वृक्षलागवडीसाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून खड्डे खोदले जातात. तसेच मागील दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायती अंतर्गत रोपवाटिका तयार करुन संबंधित ग्रामपंचायतींना रोपे वितरित करण्यात आली. यावर शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. जि.प.च्या रोहयो कक्षाने प्रत्येक पंचायत समितीला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार भूम पंचायत समितीसाठी २ लाख रोपे लागवडीचे उद्दीष्ट मिळाले होते. मात्र या पंचायत समितीने १ लाख ६४ हजार रोपांचीच लागवड केली.
दरम्यान, ही रोपे जगविण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न होणे गरजेचे होते तसे झाले नसल्याचे जगलेल्या रोपांच्या आकडेवारीवरुन समोर येते. १ लाख ६४ हजार रोपांची लागवड केली असता, त्यापैकी केवळ १० टक्के रोपे जगली असे खुद्द पंचायत समिती प्रशासनाकडून सांगितले जात आहे. याचाच अर्थ केवळ १६ हजार रोपे जगविण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरित १ लाख ४८ हजार रोपे करपून गेली. त्यामुळे खड्डे खोदण्यापासून ते रोपांची जोपासनी करण्यापर्यंत झालेला लाखोंचा खर्चही खड्ड्यात गेला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पावसाचे प्रमाणही चांगले होते. त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणात जगतील, अशी अपेक्षा होती. मात्र समोर असलेले हे चिंताजनक चित्र
कुठेतरी संशोधन करण्यास भाग पाडणारे आहे.
लाखोंचा खर्च गेला खड्डयात
वृक्ष लागवड केल्यानंतर ते जगतात की नाही, हे पाहण्याची तसदी न घेणाऱ्या भूम पंचायत समितीला पुन्हा ८३ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ८३ हजार खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत असा दावा पंचायत समितीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या रोपांची लागवड झाल्यानंतर यावेळी तरी जास्तीत जास्त रोपे जगविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा ‘पहिले पाढं पंचावन्न’ या म्हणीचा प्रयत्न पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही.