अधिकाऱ्यांचेही आंदोलन
By Admin | Updated: August 6, 2014 02:36 IST2014-08-06T02:24:42+5:302014-08-06T02:36:04+5:30
औरंगाबाद : कर्मचाऱ्यांपाठोपाठ महसूल विभागातील अधिकारीही मंगळवारपासून संपात उतरले.

अधिकाऱ्यांचेही आंदोलन
औरंगाबाद : कर्मचाऱ्यांपाठोपाठ महसूल विभागातील अधिकारीही मंगळवारपासून संपात उतरले. नायब तहसीलदारांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्या वेगळ्या मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले. दुसरीकडे महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच राहिला. परिणामी महसूल विभागाचे कामकाज शंभर टक्के ठप्प झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज केवळ जिल्हाधिकारी विक्रम कुमार आणि अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे हे दोघेच हजर होते.
कर्मचाऱ्यांचाही संप सुरू असल्यामुळे संपूर्ण कार्यालय ओस पडले होते. परिणामी सामान्यांचे हाल झाले. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तसेच परतावे लागले. नियोजित सुनावण्या रद्द झाल्या. प्रमाणपत्र वितरणाचे काम बंद झाले.
महसूल कर्मचारी संघटनेने शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. नायब तहसीलदारपदाचा ग्रेड पे वाढवून द्यावा, लिपिकाचे पदनाम बदलावे, नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरावीत, कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती लागू करावी इ. मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाचा आज चौथा दिवस होता. त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज आधीच जवळपास ८० टक्के ठप्प झाले होते.
त्यातच सीआरपीसी कलम १५३(३) मध्ये उपाययोजना करण्याची मागणी मान्य न झाल्याने राज्य तहसीलदार/नायब तहसीलदार संघटना या अधिकाऱ्यांच्या संघटनेने आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले. संघटनेने आधीच ५ आॅगस्टपासून काम बंदचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळपासून नायब तहसीलदारांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी काम बंद केले. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. सामान्य प्रशासन, पुरवठा, गृह, महसूल, रोहयो, करमणूक कर, भूसंपादन, अकृषिक, संजय गांधी निराधार योजना, राजशिष्टाचार, नगरपालिका प्रशासन, पुनर्वसन आदी सर्वच शाखांमध्ये एकही अधिकारी, कर्मचारी हजर नव्हता.