बौद्ध धम्माची दिक्षा म्हणजेच ओबीसींची ‘घरवापसी’
By Admin | Updated: March 19, 2015 23:56 IST2015-03-19T22:42:32+5:302015-03-19T23:56:05+5:30
शिरीष शिंदे, बीड ‘आम्ही हिंदू असतानाही क्षुद्रांप्रमाणे वागणूक दिली जाते. ओबीसी हे नागवंशी असल्याने बौद्ध धम्म हा आमचा मूळ धर्म आहे. बौद्ध धम्माची दिक्षा घेणे

बौद्ध धम्माची दिक्षा म्हणजेच ओबीसींची ‘घरवापसी’
शिरीष शिंदे, बीड
‘आम्ही हिंदू असतानाही क्षुद्रांप्रमाणे वागणूक दिली जाते. ओबीसी हे नागवंशी असल्याने बौद्ध धम्म हा आमचा मूळ धर्म आहे. बौद्ध धम्माची दिक्षा घेणे ही ओबीसींची घरवापसी आहे’, असे परखड मत सत्य शोधक ओबीसी परिषदेचे राष्ट्राध्यक्ष हनुमंत उपरे यांचे होते. २०१६ पर्यंत पाच लाख हिंदू ओबीसींना धम्माच्या वाटेवर नेण्याच्या संकल्पाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ही त्यांनी धक्का दिला होता. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळ पोरकी झाली आहे.
ओबीसींचे सामाजिक प्रश्न जेथे कोठे निर्माण होत तेथे हनुमंत उपरे उर्फ काका यांचे नाव समोर यायचे. कारण त्यांनी ओबीसींसाठी आपले आयुष्य वेचले होते. त्यांच्या ओेबीसींसाठीच्या कार्याचा आलेख वाढतच गेला होता. धर्म हा एखाद्या घराप्रमाणे असतो तेथे सर्वांना समान व आदराची वागणूक दिली जाते. तेथे कोणाताही भेदभाव नसतो. ज्या हिंदू धर्माला विशिष्ठ नावे देऊन असभ्य वर्तणूक दिली जाते त्या घरात राहण्यात काहीच अर्थ नाही अशी आर्त हाक देत त्यांनी २०११ पासून ओबीसी धर्मांतराचा लढा उभा केला.
आपली भूमिका त्यांनी सक्षमपणे ओबीसी बांधवासमोर मांडली. पाहता पाहता त्यांनी चार वर्षात अनेकांना धम्माच्या वाटेवर नेले. २०१६ पर्यंत पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा देण्याचा संकल्पातून त्यांनी काम अखंडपणे सुरुच ठेवले होते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जाती व्यवस्था नष्ट होईल असे ओबीसींना वाटले होते; मात्र तसे न होता उच्च वर्णीयांनी जातीव्यवस्था कायम ठेवल्याने ओबीसी गरीबच राहिले. कालबाह्य जातीव्यवस्था जिवंत ठेवल्यामुळे आजही ओबीसींचा विकास झाला नाही. त्यामुळे आपण बौद्ध धम्मात जाण्याचा सल्ला त्यांनी कायम दिला.
वामन दहनासाठी नेहमीच पुढाकार
दिवाळीमध्ये हमखास वामन दहन करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार होता. सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन ते शहरातील मुख्य भागातून स्वत: हातात गाडगं धरुन चालायचे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आणून त्याचे दहन करायचे. ‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशा घोषणा देत मनुवादी विचारांचे दहनही व्हायचे. आता प्रत्येक दिवाळीला वामन दहनाच्या वेळी त्यांची आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही. ओबीसींसाठी खऱ्या अर्थाने झटणारा, बहुजनांचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. हे कटु वास्तव ओबीसींनी स्वीकारुन त्यांनी सांगितलेल्या वाटेवर जाणे हे सर्वांसाठी योग्यच ठरणार आहे. वर्णभेद व जातीच्या विभागणीस तिलांजली देऊन सर्वांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन त्या मार्गाचा अवलंब करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.