रोजगारासाठी आता महासोसायटी स्थापणार
By Admin | Updated: May 19, 2014 01:09 IST2014-05-19T00:51:01+5:302014-05-19T01:09:06+5:30
जालना : जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण संस्था, उद्योजक, शासकीय कार्यालय यांच्या योजनातून निर्माण होणारा रोजगार
रोजगारासाठी आता महासोसायटी स्थापणार
जालना : जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण संस्था, उद्योजक, शासकीय कार्यालय यांच्या योजनातून निर्माण होणारा रोजगार आणि स्वयंरोजगार एकसंघ करून कालानुरूप तसेच मागणीप्रमाणे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरावर महासोसायटी स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रोजगाराभिमुख एकत्रित प्रयत्नांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सांगितले. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातील व्यवसाय प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी नायक बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृक्षाली सोन्ने, जिल्हा समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.एन. वीर, आय.टी.आयचे धानोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे, उद्योजक सुनील रायठठ्ठा व अर्जुन गेही, व्यवसाय प्रशिक्षक के.एस. रावते उपस्थित होते. ‘व्हाबं्रट जालना’ या संकल्पनेतून जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षितांना रोजगार आणि स्वयंरोजगार अभ्यासक्रम चालवणार्या संस्थांना एकत्रित आणून त्यांच्यात सूसूत्रता निर्माण करण्याचा आणि या माध्यमातून औद्योगिक संस्थांना, उद्योजकांना आणि इतर संस्थांना लागणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम या माध्यमातून व्हावा, हा या मागचा हेतू तर आहेच. त्याबरोबरच अशा प्रशिक्षणातून स्वयंरोजगार आणि उद्योग उभारण्याची प्रेरणा निर्माण करून जिल्ह्यातील तरूणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले की, जिल्ह्यात आयटीआय, जिल्हा उद्योग केंद्र, महाबँक ग्रामीण प्रशिक्षण संस्था, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय, के.व्ही.के. आदी विविध संस्थांतर्फे विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. परंतु त्यात समन्वय नाही. तसेच कालारूप त्यात बदल करण्यात आले नाहीत. उद्योजकांना आवश्यक असलेले कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, म्हणून या महासोसायटीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत, या सोसायटीत २० जणांचा सहभाग असेल, असेही ते म्हणाले. यावेळी रेशीम अधिकारी जाधव यांनी रेशीम उत्पादक, त्याचा लाभ घेणारे शेतकरी, त्यांना देण्यात येणार्या सुविधा या शेती व्यवसायातून निर्माण होणारी रोजगार निर्मिती आणि आर्थिक सुबत्ता या बाबत माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्ह्यात रेशीम उद्योगासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन कसे करता येईल, याची माहिती देण्यास सांगून महाबँकेच्या मध्यस्थीने रेशीम शेती करणार्या शेतकरी महिला व पुरूष शेतकर्यांना प्रशिक्षण आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. या चर्चेत उद्योजक रायठठ्ठा यांनी जिल्ह्यातील तालुकास्तरावरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी (आयएमसी) तर्फे राबविण्यात येणार्या उपक्रमासाठी सुमारे अडीच कोटी रूपये प्रत्येक आयटीआयला उपलब्ध झाले आहेत. त्या निधीचा योग्य वापर व्हावा. विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू व्हावेत. त्यातून कौशल्य प्राप्त मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल, असे सूचविले. त्यावर नायक यांनी लवकरच संबंधितांची बैठक घेऊन याबाबतच्या कामांना गती देण्यात येईल, असे सांगितले. औरंगाबाद येथील इंडो-जर्मन टूल्स आणि सिवेट तर्फे जिल्ह्यात कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करण्याची इच्छा आहे. त्यांना जिल्हा प्रशासनाने मदत करावी, अशी विनंती रायठठ्ठा यांनी केली. त्यावर जालना आयटीआय आणि या दोन्ही संस्थांना एकत्र बसून प्रस्ताव तयार करावा आणि असे अभ्यासक्रम सुरू करण्यास पुढाकार घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले. जालन्यातील एमआयडीसीच्या तिन्ही फेजमधील अडचणी व इतर अनुषांगिक बाबींबाबत लवकरच जिल्हा उद्योग समितीची बैठक घेऊन प्रश्न सोडविले जातील, असेही नायक यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) कम्युनिटी कॉलेजची संकल्पना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोन्ने यांनी त्यांच्या केंद्रातर्फे राबविण्यात येणार्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती तसेच जिल्ह्यातील उद्योजकांनी मागणी केल्यानुसार १०२० प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची कल्पना स्पष्ट केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन करून कोणते प्रशिक्षण कोणती संस्था देईल, याचा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सूर्यवंशी यांनीही संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांच्या विभागाच्या योजनांची माहिती दिली. नायक यांनी जिल्ह्यातील तसेच औरंगाबादच्या उद्योजकांच्या मदतीने कम्युनिटी कॉलेजची संकल्पना राबविण्याबाबत आराखडा तयार करावा, करिअर लायब्ररीची सोय जिल्हा ग्रंथालयात करू, असे सांगितले.