आता पोलिसांच्या व्हॉटस्अॅपवर नोंदवा तक्रार
By Admin | Updated: February 10, 2016 00:17 IST2016-02-10T00:13:37+5:302016-02-10T00:17:44+5:30
लातूर : लातूर पोलिसांचे काम चांगले आहे. पोलिसांनी लावलेल्या तपासामुळे मिळालेल्या शिक्षेचे प्रमाण २०१३ पासून दरवर्षी वाढलेले दिसले.

आता पोलिसांच्या व्हॉटस्अॅपवर नोंदवा तक्रार
लातूर : लातूर पोलिसांचे काम चांगले आहे. पोलिसांनी लावलेल्या तपासामुळे मिळालेल्या शिक्षेचे प्रमाण २०१३ पासून दरवर्षी वाढलेले दिसले. सोनसाखळीचोर, चोऱ्या आणि दरोड्याच्या गुन्ह्याचे तपास आणि पोलिस ठाण्यातील दप्तरी लेखाजोखा पाहता लातूरच्या पोलिसांचे काम चांगले वाटले. पोलिस आणि नागरिक यांच्यातील सलोखा वाढविण्याच्या मोहिमेला आता लातूरचे पोलीस निश्चित गती देऊन काम करणार असून पोलिसांच्या व्हॉटस्अॅपवर सुद्धा नागरिक थेट तक्रारी नोंदवू शकतील, असे नांदेड परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लातूर जिल्ह्याच्या पहिल्या भेटीत पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लातूर पोलिसांनी बँकेमध्ये गॅस कटर घेऊन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पकडली. दुचाकी चोरीच्या टोळ्या पकडल्या. सोनसाखळी चोरांची टोळी पकडली. दरोड्यांच्या गुन्ह्यातील चोरांना जेरबंद केले. अशा गुन्हे उकलण्याचे प्रमाण जिल्ह्यात निश्चित समाधानकारक आहे. त्याहीपेक्षा पोलिसांनी केलेल्या तपासावर गुन्हेगारांना मिळणाऱ्या शिक्षेचे प्रमाण गेल्या तीन वर्षात चढत्या आलेखावर आहे. यावरुनच पोलिसांची कर्तव्यदक्षता दिसून येते. पोलिस ठाण्यातील दप्तरी नोंदी चांगल्या आहेत.
काही उणीवाही दिसून आल्या. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मुख्य आहे. नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात पोलिस यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळामुळे कमी पडते आहे. आमच्या पोलिस महासंचालकांनी पोलिसांना नागरिकांत मिसळण्याचे आवाहन केले आहे. या कार्यप्रणालीत पोलिस शाळा - कॉलेजमध्ये जाऊन मुले-मुली आणि शिक्षकांशी संवाद साधतील. विविध मोहल्ल्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधतील. यासाठी पोलिस मित्रांची विशेषत: जास्त मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.