आता मांडव वारे वाहू लागले

By Admin | Updated: October 17, 2014 00:26 IST2014-10-17T00:12:19+5:302014-10-17T00:26:31+5:30

जालना : गेल्या दीड दोन महिन्यांपासून निवडणुकीच्या उडालेल्या रणधुमाळीस बुधवारी पूर्णविराम मिळाला. अन्य उमेदवारांपासून तालुकास्थानापासून

Now the Mandavah wind started moving | आता मांडव वारे वाहू लागले

आता मांडव वारे वाहू लागले


जालना : गेल्या दीड दोन महिन्यांपासून निवडणुकीच्या उडालेल्या रणधुमाळीस बुधवारी पूर्णविराम मिळाला. अन्य उमेदवारांपासून तालुकास्थानापासून ते खेड््यपाड्यातील वाडी तांड्यावरील स्थानिक पुढारी व कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारपासून ग्रामीण भागातील जनजीवन संथगतीने का असेना पूर्वपदावर येऊ लागले. परंतु राजकीय लगीन घाईचे मांडव वारे वाहू लागल्याचे प्रकर्षाने दिसून आले.
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावणाऱ्या अलिशान लक्झरी गाड्या... त्यातून कडक खादीत वावरणारे पुढारी व कार्यकर्ते... त्यांच्या स्वागतासह जल्लोषात बेफान झालेले स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते...चावडीवरील कॉर्नर सभा... त्यातील आरोप-प्रत्यारोप व एकेरी भाषा... अन् धुराडे उडवीत जाणारे ताफे असे गेल्या पंधरा दिवसांतील ग्रामीण भागातील चित्र होते.
लोकसभा निवडणुकीपासूनच ग्रामीण भाग निवडणूकमय झाला होता. कारण त्या निवडणुकीतील प्रचारयुध्दा पाठोपाठ जिल्ह्यातील मातब्बर पुढाऱ्यांनी जय-पराजयाची विश्लेषने करीत तातडीने मोर्चेबांधणी सुरु केली होती. आळस झटकून हे मातब्बर प्रचार दौऱ्यावर गुंतले होते. विशेषत: सत्तारुढ असो की विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी संभाव्य आचारसंहिता ओळखून आपापल्या कार्यक्षेत्रात गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेकरीता कार्यक्रमांचा धुमधडाका सुरु केला होता. भूमीपूजने, उद्घाटने, लोकार्पण सोहळे रंगू लागले होते. एकाका दिवशी किमान अर्धा डझन कार्यक्रमांची कार्यक्षेत्रात रेलचेल होती. निवडणुकीचा कार्यक्रम पाठोपाठ आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कार्यक्रमांचा तो धुमधडाका थांबला खरा, परंतू तेथून प्रचाराचा धुराडा उडाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शक्तीप्रदर्शनांपासून ते आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यांपर्यंत खेडोपाडी, वाडीतांडे या प्रचार युध्दाने अक्षरश: गजबजून गेले होते. मातब्बर मंडळींनी गेल्या चार महिन्यांपासून तर निवडणुक रिंगणात नव्याने उतरलेल्या नवख्यांनी गेल्या आठ पंधरा दिवसांतच सर्व शक्तीनिशी ग्रामीण भागात धुराडा उडविला होता.
महायुती व आघाडी संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवरच दुरंगी लढती चौरंगी किंवा बहुरंगी झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील त्या-त्या पक्षांच्या अडगळीत पडलेल्या स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सुगीचे दिवस आले होते. तेथूनच ते कपड्यांवरील धुळ झटकून कामास जुंपले होते ते बुधवारी मतदानाच्या टप्प्यापर्यंत. गेल्या आठ दिवसांत तालुका स्थानापासून खेडीपाडी व वाडीतांड्यांवर सद्यस्थितीत वॉर्डनिहाय गाठीभेटी, कॉर्नर सभा, बैठकांना ऊत आला होता. गल्ली बोळातून ध्वनीक्षेपकावरुन कर्नकर्कश प्रचार करणाऱ्या अ‍ॅटोरिक्षा, जीपगाड्या धुमाकूळ घालत आहेत. फाट्यांवरील छोट्या मोठ्या हॉटेल्स, ढाबे गजबजून गेले होते. जावे त्या ठिकाणी निवडणुकीचीच चर्चा रंगली होती. ओट्या-ओट्यांवर, कट्ट्यांवर रात्री बेरात्रीपर्यंत उमेदवारांनी केलेल्या युक्त्या, क्लुप्त्या व खेळलेल्या डावपेचांच्याच गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भाग अक्षरश: निवडणूकमय झाला होता. बुधवारी मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर स्थानिक व कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शांतपणे मतदानाची आकडेवारीचा अंदाज घेतला. पुढाऱ्यांचे बंगले गाठून स्थिती कानावर टाकली. असापासच्या घडामोडींचा अंदाज घेतला. अन हे सारे माघारी परतले. गुरुवारची सकाळ व दिवस या साऱ्यांसाठी निश्चिंत असाच होता. (प्रतिनिधी)

Web Title: Now the Mandavah wind started moving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.