आता जालनेकरांना पुन्हा ‘सिडको’ प्रकल्पाची आशा
By Admin | Updated: June 15, 2015 00:14 IST2015-06-15T00:14:06+5:302015-06-15T00:14:06+5:30
जालना : शहरात सिडको येणार, असे गेल्या सात वर्षांपासून ऐकणाऱ्या जालनेकरांनी गेल्या दीड वर्षांपासून हा नियोजित प्रकल्प परत गेल्याने मोठ्या वसाहतीची आशा सोडली होती.

आता जालनेकरांना पुन्हा ‘सिडको’ प्रकल्पाची आशा
जालना : शहरात सिडको येणार, असे गेल्या सात वर्षांपासून ऐकणाऱ्या जालनेकरांनी गेल्या दीड वर्षांपासून हा नियोजित प्रकल्प परत गेल्याने मोठ्या वसाहतीची आशा सोडली होती. परंतु खा. रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वीच सिडको येणारच, मात्र त्यासाठी जागा नव्याने निवडण्यात येणार असल्याचे सांगितल्याने जालनेकरांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.
शहरातील औरंगाबाद मार्गावर २००८ मध्ये सिडको प्रकल्प उभारणीच्या हालचालींना सुरूवात झाली होती. सुरूवातीला नागेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध दर्शविला होता. मात्र नंतर योग्य किंमत मिळणार असेल तर जागा देण्याची तयारीही दर्शविली होती.
सिडको प्रशासनाने आपल्या नियोजित प्रकल्पासाठी साडेसातशे हेक्टर जमिनीचे सर्वेक्षणही केले होते. जमीन संपादित करण्यासाठी ३८ कोटी रुपये उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सिडकोने स्वाधीन केले होते.
परंतु नंतर काही कारणास्तव सिडको प्रकल्प उभारणीचा विषय मागे पडला. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडील वरील रक्कमही परत सिडको प्रशासनाकडे परत देण्यात आली. त्यामुळे सिडको प्रकल्पाच्या विषयाला गेल्या दीड वर्षापासून पूर्णविराम मिळाला होता.
या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी जालन्यात पत्रकारांशी बोलताना सिडको प्रकल्प जालन्यात होणारच असे सांगून तो कोणत्या ठिकाणी करावयाचा, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आगामी महिन्यात संबंधित यंत्रणेची बैठक बोलाविण्यात आल्याचे खा. दानवे यांनी सांगितले. त्यासोबतच म्हाडाकरिता जागा उपलब्ध झाल्यास त्याचीही उभारणी करण्याचा मनोदय व्यक्त केला. (प्रतिनिधी)४
जालनेकरांमध्ये पुन्हा एकदा सिडकोच्या चर्चेला प्रारंभ झाला आहे. सिडकोसारखी नवीन वसाहत स्थापन झाल्यास शहराचा विकास झपाट्याने होण्यास मदत होईल, तसेच सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी जागा मिळेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे सिडको प्रकल्पाबाबत आगामी काळात काय हालचाली होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.४
सिडको प्रकल्पासंबंधी लवकरच संबंधित यंत्रणेची बैठक जालना येथे घेण्यात येणार आहे.जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने या प्रकल्पाचा मार्गही सोपा झाला आहे. मोठ्या वसाहतीची निर्मिती झाल्यास त्याचा फायदा येथील जनतेला होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत नवीन जागेचा शोध घेण्यासंबंधी चर्चा होईल, असे सांगण्यात आले.