आता 24७7 पाणी नाही

By Admin | Updated: April 13, 2016 00:54 IST2016-04-13T00:41:53+5:302016-04-13T00:54:54+5:30

औरंगाबाद : बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांवर भर दुष्काळात २४ तास पाण्याची खैरात करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) अखेर उपरती आली आहे.

Now 2477 does not have water | आता 24७7 पाणी नाही

आता 24७7 पाणी नाही


औरंगाबाद : बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांवर भर दुष्काळात २४ तास पाण्याची खैरात करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) अखेर उपरती आली आहे. या उद्योगांना २४ तास मिळणाऱ्या शुद्ध पाण्यात अखेर कपात करण्यात आली असून, आता औद्योगिक वसाहतींना ३ ते १४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही अघोषित पाणी कपात येत्या १५ एप्रिलपासून अमलात आणली जाणार आहे.
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांना १६ रुपयांत एक हजार लिटर या दराने शुद्ध पाण्याचा २४ तास पुरवठा केला जात होता. मद्यनिर्मिती करणारे १२ उद्योग दररोज ४० लाख लिटर पाण्याचा वापर करीत होते.
‘लोकमत’ने याबाबत ७ एप्रिलपासून प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमुळे खळबळ उडाली. आ. अब्दुल सत्तार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर उद्योगांची पाणी कपात अटळ मानली जात होती; परंतु पाणी कपातीवर ठोस निर्णय घेण्याऐवजी अप्रत्यक्षपणे ती लागू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राला २४ तास होणारा शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’ने घेतला आहे. येत्या १५ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
म्हणे, ही काटकसर
जायकवाडी धरणात सध्या जिवंत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने मृत साठ्यातून औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जात आहे. मृत साठादेखील दररोज घटत आहे. औद्योगिक वसाहतींसाठी ब्रह्मगव्हाण येथील केंद्रातून पाण्याचा उपसा केला जातो. त्या ठिकाणीदेखील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या ७ एप्रिल रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत जायकवाडीतील पाण्याचे नियोजन करून काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे. ब्रह्मगव्हाण येथील योजनेतून पाणी उचलण्यासाठी द्विस्तरीय पम्पिंग योजना राबविली जात असल्याचे ‘एमआयडीसी’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
औरंगाबादेतील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्थानक आणि जालना औद्योगिक वसाहतींना यापूर्वी २४ तास पाणीपुरवठा केला जात होता. आता मात्र त्यासाठी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. वाळूजला सकाळी १० ते रात्री २ वाजेपर्यंत, असा १४ तास पुरवठा केला जाईल. चिकलठाण्याला सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सहा तास, शेंद्र्याला सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बारा तास, रेल्वेस्थानक औद्योगिक वसाहतीला सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत १४ तास, तर जालना औद्योगिक वसाहतीला सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत तीन तासच पाणीपुरवठा केला जाईल. वाळूज निवासी क्षेत्रास सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत, असा पाच तास पाणीपुरवठा केला जाईल.
जायकवाडीतील पाण्याच्या वापराचे नियोजन ‘एमआयडीसी’ने केले आहे. औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी आता वेळा निश्चित करण्यात आल्या असून, कपात मात्र करण्यात आलेली नाही. वेळापत्रकामुळे उद्योगांना पाण्याची कमतरता भासणार नाही.
-आशिष गर्दे, अध्यक्ष, सीएमआयए

Web Title: Now 2477 does not have water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.