सेलू शहराला पाणीटंचाईचे ‘नो टेन्शन’
By Admin | Updated: May 25, 2014 01:10 IST2014-05-25T00:53:07+5:302014-05-25T01:10:40+5:30
सेलू : निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने यावर्षी सेलू शहराला पाणीटंचाईचे कोणतेही टेन्शन नाही़ यामुळे उन्हाळ्यातही दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़

सेलू शहराला पाणीटंचाईचे ‘नो टेन्शन’
सेलू : निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने यावर्षी सेलू शहराला पाणीटंचाईचे कोणतेही टेन्शन नाही़ यामुळे उन्हाळ्यातही दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे प्रथमच निम्न दुधना प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला़ त्यामुळे अनेक गावांची पाणीटंचाईपासून सुटका झाली आहे़ अनेक वर्षांपासून सेलू शहराला दुधना नदीच्या राजवाडी पात्रातून सेलू शहराला पाणीपुरवठा जुन्या लाईनवरून करण्यात येतो़ त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात राजवाडी येथील दुधना नदीचे पात्र कोरडे पडल्यानंतर शहराला पाणीटंचाई भासत असे़ त्यामुळे नगरपालिका उन्हाळ्याच्या दिवसात नदीपात्रात खड्डे खोदून पाणी एकत्र करून पाणीपुरवठा करण्याची कसरत करीत होती़ परंतु, काही वर्षापूर्वीच शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ त्यानंतर निम्न दुधना प्रकल्पाच्या येवला पुनर्वसन हे शहरातील तीन जलकुंभांना पाईपलाईन जोडण्यात आली़ त्यानंतर निम्न दूधना प्रकल्पातून शहरातील तिन्ही जलकुंभ भरण्यात येत आहेत़ या योजनेचे जलशुद्धीकरण प्रकल्प सातोना रस्त्यावर उभारण्यात आला आहे़ तसेच इतर कामेही अंतिम टप्प्यात आहेत़ शहराला दररोज १३ लाख लिटर पाणी लागते़ सध्या तीन जलकुंभातून पाणी वितरित केले जाते़ वाढीव पाणीपुरवठा योजनेत इतर जलकुंभाचे कामे करण्यात येत आहेत़ सध्या निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी मिळत आहे़ मात्र जलकुंभाची क्षमता कमी असल्यामुळे काही भागात दोन दिवसाआड तर काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत होते़ मात्र यावर्षी दुधना प्रकल्पात पाणीसाठा असल्यामुळे नगरपालिकेलाही पाणीपुरवठा करताना अडचण राहिलेली नाही़ परिणामी टंचाईच्या झळापासून शहराला मुक्तता मिळाली आहे़ (प्रतिनिधी)निम्न दुधना प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे़ सध्या तीन जुन्या जलकुंभातून पाणी वितरित केले जाते़ शहराचा विस्तार पाहता तीन जलकुंभ अपुरे पडतात़ मात्र नवीन योजनेतून जलकुंभाचे काम पूर्ण झाल्यानंतर दररोज शहराला पाणीपुरवठा होणार आहे़ उन्हाळ्यातही शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू असून, निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे सेलू शहराला पाणीटंचाईची कुठलीही भिती नाही़ निम्न दुधना प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या पंप हाऊसलाही एक्सप्रेस लाईन आहे़ त्यामुळे शहराला पाणीटंचाईचे कुठलेही टेन्शन नसल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी दिली़