पगारी नाहीत, वसुलीला रोखू नका...
By Admin | Updated: February 9, 2016 00:24 IST2016-02-08T23:43:51+5:302016-02-09T00:24:43+5:30
उस्मानाबाद : रबी हंगाम २०१४-१५ ची ४६.२५ लाखांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहे.

पगारी नाहीत, वसुलीला रोखू नका...
उस्मानाबाद : रबी हंगाम २०१४-१५ ची ४६.२५ लाखांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून सदर रकमा वर्ग करण्याचे काम सुरू असतानाच बँक कर्मचाऱ्यांनीही वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारी झालेल्या नाहीत. त्यामुळे विम्याच्या रकमेतून थकित रकमा वसूल कराव्यात, अशी मागणी केल्याने याप्रकरणी जिल्हा बँक समन्वयाने कसा मार्ग काढते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रबी हंगाम २०१४-१५ साठी जिल्हा बँकेकडे ४६.२५ लाखांची रक्कम प्राप्त झाली आहे. सदर रकमेचे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी याद्या करण्याचे कामही बँकेने हाती घेतले आहे. याच अनुषंगाने सोमवारी सर्किट हाऊसवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बँकेतील सत्ताधारी संचालकांची बैठक पार पडली. मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या विमा रकमेतून थकबाकी वसूल करणे योग्य होणार नाही. त्यामुळे पीक विम्यातून कर्जाची रक्कम कपात न करता संबंधित शेतकऱ्यांना रकमा वितरित कराव्यात, असे निर्देश आ. पाटील यांनी या बैठकीत संचालकांना दिले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष कैैलास शिंदे यांच्यासह सत्ताधारी संचालकांनी आ. पाटील यांच्या या सूचनेला संमती दर्शविली. या बैठकीनंतर बँकेचे अध्यक्ष देशमुख यांनी जिल्हा बँकेत कार्यकारी संचालकासह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विम्याच्या रकमा थकबाकी वसूल न करता शेतकऱ्यांना वितरित करण्याचे निर्देश दिले. मात्र, या निर्णयाला जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला.
बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मागील सहा महिन्यांपासून पगारी झालेल्या नाहीत. अनेकांकडे वर्षानुवर्षाची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल न झाल्यास बँकेचा परवाना अडचणीत येवून बँक बंद करण्याची नामुष्की येईल. जिल्हा बँकही शेतकऱ्यांचीच आहे. त्यामुळे वसुलीसाठी सहकार्य करून बँक कशी उभी राहील, हे पहावे, असे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संचालकांना सुनावल्याचे समजते. थकबाकी वसुलीचे रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट निर्देश असल्याचेही या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने पीक विम्याच्या रकमेतून थकित वसुली होणार की जिल्हा बँक रकमा थेट वितरित करणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्हा बँक संचालकांचीही ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली असून, यातून काय तोडगा निघतो, याकडे आता लक्ष लागले आहे.