लातूरच्या पाण्यात नायट्रेट
By Admin | Updated: May 25, 2015 00:28 IST2015-05-25T00:14:33+5:302015-05-25T00:28:24+5:30
सितम सोनवणे , लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मार्च महिन्यात ५६६३ पाणी नमुन्यांपैकी ३५९१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

लातूरच्या पाण्यात नायट्रेट
सितम सोनवणे , लातूर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मार्च महिन्यात ५६६३ पाणी नमुन्यांपैकी ३५९१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ६७९ पाणी नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळ
ले आहे. शिवाय, अहमदपूर तालुक्यातील काही गावांत पाणी नमुन्यांत फ्लोराईड आढळले आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंतेत असून, संबंधित ग्रामपंचायतींना त्यांनी शुद्ध पाण्याबाबत सूचना केल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात ६१, जळकोट तालुक्यात १३५, लातूर ०१, निलंगा २४५, उदगीर २३७ असे एकूण ६७९ जलस्त्रोतात दोष आढळला आहे. या पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. सदर पाणी पिण्यासाठी हानीकारक असून, शरिराला अपायकारक आहे. त्यातच अहमदपूर तालुक्यात ७ व रेणापूर तालुक्यात १ जलस्त्रोत फ्लोराईडयुक्त आहेत. नायट्रेटपेक्षा फ्लोराईड घातक आहे. वर्षभरापूर्वी राज्य शासनाने फ्लोराईड पाणी असलेल्या गावांत एक मोहीम राबविली होती. या मोहिमेत तेथील पाणी फ्लोराईडमुक्त करण्यासाठी योजना आखली होती. त्यावेळीही अहमदपूर तालुक्यातीलच आठ गावांत फ्लोराईडयुक्त पाणी आढळले होते. आता गेल्या मार्च महिन्यात केलेल्या तपासणीतही अहमदपूर तालुक्यातील सात गावातील जलस्त्रोतात फ्लोराईड आढळले आहे. जिल्ह्यातील ६७९ जलस्त्रोतात आता नायट्रेट आढळले आहे. याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली असून, पाण्यात जर दहा मिलीपेक्षा अधिक नायट्रेट असल्यास लहान मुलांना मिथॅमोग्लोबिनामिया हा आजार होतो. शरीर निळे पडते, आॅक्सीजन कमी होतो, त्यामुळे रुग्ण मुलाला कृत्रिम आॅक्सीजन लावावा लागतो तर मोठ्या माणसांना ब्लडप्रेशर, पोटदुखी, पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्य विभागाने भीती व्यक्त केली आहे.
शिवाय, तसे संबंधित ग्रामपंचायतींना सूचना केल्या असून, पाणी स्त्रोताचे शुद्धिकरण करावे, असे पत्र आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना पाठविले आहे. फ्लोराईडचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी रेणापूर तालुक्यातील एका जलस्त्रोत नव्याने वाढला आहे. अहमदपूर तालुक्यात पूर्वी आठ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी आढळले होते. आता सात ठिकाणी फ्लोराईड आढळले आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे हाडे व दात ठिसूळ होणे, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, पोटाचा विकार, लिव्हर, किडनी, हृदय कोशिकेवर परिणाम होणे आदी आजार उद्भवतात. या पद्धतीचे रुग्ण अहमदपूर तालुक्यात आढळले नसले तरी शेजारच्या नांदेड जिल्ह्यात असे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या सातही ठिकाणचे पाणी पिण्यास वापरू नये, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, पाण्यात नायट्रेट आणि फ्लोराईडचे प्रमाण येत असल्यामुळे सर्वच पाणी तपासण्याची मोहीम आरोग्य विभागामार्फत राबविली जाईल.
वातावरणातील नायट्रोजन वायूचा संपर्क जमिनीवरील माती व पाण्यासोबत आल्याने नायट्रेटचे मिश्रण पाण्यात होते. आकाशातील वीज निर्मितीमुळेही नायट्रोजन आॅक्साईड तयार होतो. जमीन पाणी व वृक्षाद्वारे नायट्रेट निर्मिती होत असून, रासायनिक खतांचा अति वापर झाल्यानेही नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. जनावरांचे मलमूत्र, घरातील व कारखान्यांतील सांडपाण्याचा जमिनीवर होणारा निचरा हे नायट्रेटचे प्रमाण वाढण्याचे कारण आहे, अशी माहिती जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. सुभाष मद्रेवार यांनी सांगितले.
फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे दात आणि हाडे ठिसूळ होतात. दात, हाडांचा फ्लोरिसिस असे या आजाराचे नाव आहे. माणसाची वाढही खुंटते. हिमोग्लोबीनचे प्रमाण व पोटाचा विकार उद्भवतो. यामुळे फ्लोराईडयुक्त पाणी घातक आहे. दात ठिसूळच नाही तर पिवळे पडतात, असे दंतरोग तज्ज्ञ डॉ. धनराज शितोळे यांनी सांगितले.