केवळ २०० रुपयांसाठी घेतला नऊ जणांचा बळी

By Admin | Updated: June 12, 2017 00:20 IST2017-06-12T00:18:29+5:302017-06-12T00:20:31+5:30

बीड : आष्टीत झालेल्या अपघातातील सागर ट्रॅव्हल्सला केवळ ३४ लोक (३० प्रवासी, २ चालक व २ क्लिनर) बसविण्याची परवानगी होती.

Nine people took only 200 rupees for a victim | केवळ २०० रुपयांसाठी घेतला नऊ जणांचा बळी

केवळ २०० रुपयांसाठी घेतला नऊ जणांचा बळी

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आष्टीत झालेल्या अपघातातील सागर ट्रॅव्हल्सला केवळ ३४ लोक (३० प्रवासी, २ चालक व २ क्लिनर) बसविण्याची परवानगी होती. परंतु त्यांनी तब्बल ४० प्रवासी (३७ प्रवासी, २ चालक व १ क्लिनर) बसविल्याचे उघड झाले आहे. जादा बसविलेले प्रवासी हे केबीनमध्ये चालकाच्या बाजूला होते. या प्रवाशांकडून चालक हे १०० ते २०० रुपये घेतात. परंतु याच २०० रूपयांनी रविवारी नऊ जणांचा बळी घेतला.
मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. मनमानी तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. एकीकडे राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांसाठी नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु बीड जिल्ह्यात अद्यापही सुविधायुक्त व आरामदायी बसेस दाखल झालेल्या नाहीत. याचाच फायदा घेत ट्रॅव्हल्सवाल्यांची दुकानदारी जोरात सुरू आहे. बीडमध्ये बस्थानक परिसरात तर या ट्रॅव्हल्सवाल्यांनी कार्यालये उघडली आहेत. प्रवाशांना जमविण्यासाठी त्यांचे काही ‘एजंट’ परिसरात फिरत असतात. एवढेच नव्हे तर बसस्थानकातून प्रवासी पळविण्याचे धाडसही हे ‘एजंट’ रापमतील अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षाने राजरोसपणे करीत आहेत. दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच आहेत.
दरम्यान, परवानगीपेक्षाही जादा प्रवासी बसवून अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. सीटिंग किंवा स्लीपर बसेसमध्ये सर्रास असे प्रकार घडत आहेत. जे प्रवासी केबिनमध्ये बसतील त्यांच्याकडून केवळ १०० ते २०० रुपये तिकीट म्हणून घेतले जातात. हे पैसे चालक व क्लिनर लोक विभागून घेतात. याच पैशात मग रस्त्यात एखाद्या ढाब्यावर बस उभी करायची आणि जेवण करायचं, असा काहीसा त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो. परंतु हेच पैसे आपल्यासोबत असणाऱ्या ३० ते ४० प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे असतात, याची जाणीव संबंधित चालकांना नसते. ते आपल्या सवयीप्रमाणे सर्रासपणे असे पैसे वसूल करत असल्याचे समोर आले आहे.
रविवारीही बसविलेले जादा प्रवासी केबिनमध्येच होते. बोलण्याच्या नादात किंवा बाजूच्याला आलेली झोप पाहून चालकालाही डुलकी लागली. आणि चालकाचा बसवरील ताबा सुटला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Nine people took only 200 rupees for a victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.