डी़ ए क़ांबळे , हाळी हंडरगुळीविज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस केवळ चंद्रावरच नव्हे तर आता मंगळावरही जाऊन पोहोचला आहे़ परंतु, हाळी हंडरगुळीपासून जवळच असलेले खरबवाडी हे एक असे गाव आहे, जिथे अजूनही एसटीचा फेरा झाला नाही़ गावात इंटरनेट जोरात चालते पण एसटीची चाके अजून तरी चालत नाहीत़खरबवाडी हे तसे अहमदपूर तालुक्यातील गाव़ परंतु, बराचसा व्यवहार त्यांचा हाळी-हंडरगुळीशी जोडलेला़ जवळपास तीन-साडेतीनशे उंबऱ्याचं हे गाव़ आठराशेच्या आसपास लोकसंख्या़ पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय या गावात आहे़ स्वतंत्र ग्रामपंचायतही अस्तित्वात आहे़ परंतु, गाव विकासापासून कोसो दूर राहिले आहे़ हाळी-हंडरगुळीपासून या गावाचे अंतर ३ किमी इतके आहे़ त्यामुळे खरबवाडीचा दैनंदिन व्यवहार या गावाशी जोडला गेला आहे़ खरबवाडीच्या नागरिकांना कुठे बाहेरगावी जायचे असल्यास त्यांना एकतर हाळी गाठावी लागते किंवा शेजारील वायगाव पाटी़ ही दोन्ही ठिकाणे ३ ते ४ किमी अंतराची़ या अंतराचा रस्ताही धड नाही़ त्यामुळे नागरिकांची पायपीटही फारशी सोपी नाही़ पावसाळ्यात अगदी जीवावर उदार होऊन गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते़ या समस्येकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना प्रशासनाचे़ गावात एसटी सुरु करावी, यासाठी परिवहन विभागाकडे वेळोवेळी लेखी निवेदने दिली़ रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे चकरा मारल्या़ परंतु, कुठेही दाद मिळत नसल्याचे सरपंच माधव डप्पडवाड यांनी हताशपणे सांगितले़ त्यामुळे खरबवाडीचे भाग्य उजळणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़ बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ ४अठराशेच्या वर लोकसंख्या असलेल्या खरबवाडीला आजतागायत परिहवन विभागाने एसटीची सेवा दिली नाही़ गावात इंटरनेट चांगले चालते़ परंतु, एसटीची चाके चालत नाहीत़ असे असताना दर पाच वर्षातून एकदा मात्र एसटीचे दर्शन ग्रामस्थांना होते़ निवडणूकीच्या वेळी मतदान यंत्र नेण्यासाठी एसटी खरबवाडीचा रस्ता धरते़ त्यानंतर मात्र चुकूनही तिची चाके या गावाकडे वळत नाहीत़
‘नेट’ पोहोचले पण एसटी नाही
By admin | Published: October 25, 2014 11:43 PM