महिलांचे शोषण रोखण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता
By Admin | Updated: June 9, 2014 01:10 IST2014-06-09T00:55:59+5:302014-06-09T01:10:29+5:30
औरंगाबाद : १९ व्या शतकात ताराबाई शिंदे यांनी महिलांचे जे प्रश्न मांडले होते ते आजही कायम आहेत.

महिलांचे शोषण रोखण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता
औरंगाबाद : १९ व्या शतकात ताराबाई शिंदे यांनी महिलांचे जे प्रश्न मांडले होते ते आजही कायम आहेत. पितृसत्ताक पद्धतीत महिलांचे शोषण अधिक होते. ते बंद होण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी येथे जगत्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात विशेष राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दिवसभर चाललेल्या अधिवेशनात ‘मराठा सेवा संघास आत्मपरीक्षणाची गरज का आहे?’ या विषयावर परिसंवाद झाला. व्यासपीठावर पत्रकार संजय वरकड, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, मराठा सेवा संघाचे प्रवक्ते विंग कमांडर टी.आर. जाधव, द्वारकादास पाथ्रीकर, प्रा. अर्जुन तनपुरे, सामाजिक कार्यकर्त्या कुसुम पटारे, डॉ. दिलीप देशमुख, दीपक पवार उपस्थित होते.
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, ‘गुणवत्तेऐवजी कुठल्या तरी कृपेमुळे नोकरी मिळत असल्यामुळे उच्चविद्याविभूषित लोकांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना तडजोड करीत जीवन जगावे लागत आहे. हा एक नवाच प्रश्न निर्माण झाला असून त्यावर उपाय आवश्यक आहे.’ आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचा द्वेष करणारा मराठा समाज आता आरक्षणाची मागणी करून त्यांनाही आता आपला भाऊ मानत असल्याचे खेडेकरांनी सांगितले.
मनोगत व्यक्त करताना आखरे म्हणाले की, मराठा आरक्षण मान्य न झाल्यास २६ जून रोजी शासनाच्या विरोधात भूमिका घेतली जाणार आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून थोरपुरुषांचे विकृतीकरण करून भावना भडकविण्यात येत असतील तर अशा साईटस् बंद करा, अशी मागणी तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अंबिका सोनी यांच्याकडे केली होती; परंतु त्यांनी साईटस् बंद करण्यात असमर्थता दाखविली. आजही महापुरुषांची विटंबना होत असेल तर आम्ही शांत राहायचे का? असा प्रश्न आखरे यांनी विचारला. वरकड यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विंग कमांडर जाधव यांनी प्रास्तविकात सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेतला. अधिवेशनाचे सूत्रसंचालन प्रा. आर.एस. पवार यांनी केले.
बहुजन समाजाला विचारमंच दिला -शिवराज महाराज
उपेक्षितांना विचारमंच उपलब्ध करून देण्याचे काम मराठा सेवा संघ २५ वर्षांपासून करीत आहे. सेवा संघामुळेच आज बहुजन समाजात परिवर्तनाचे वारे वाहत आहे, असे प्रतिपादन शि.भ.प. शिवराज महाराज जाधव (कैकाडी महाराज) यांनी केले.
सेवा संघाचे उद्घाटन शिवराज महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कामाजी पवार, प्रदीप सोळुंके, चंद्रकांत बनसोडे, मनोज आखरे, संयोजक विंग कमांडर टी.आर. जाधव, चंद्रकांत बनसोडे व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवराज महाराज म्हणाले की, महाराजांचा सत्संग ठेवा. मात्र, त्यांना घरी नेऊ नका, त्यांना घरी नेल्यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही. त्यांचे चांगले विचार आत्मसात करा. कोणाचेही वाईट व्हावे, ही भावना मनातून कायमची नष्ट केल्यास तुमचे जीवन सार्थ ठरेल. तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्म घ्यावा, असे वाटत असेल तर जिजाऊं चा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. माणुसकीची कास धरा, असा उपदेशही त्यांनी केला.
उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना प्रदीप सोळुंके यांनी मराठा समाजातील तरुणांनी लाज न धरता कोणताही व्यवसाय करावा. त्यामुळे आर्थिक सुबत्ता येते, असे सांगितले. सेवा संघाने केलेल्या जनजागृतीमुळे महाराष्ट्रात दंगली कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांत बनसोडे यांनी प्रास्तविक, तर संजीव साठे यांनी सूत्रसंचालन केले. आभार केशव पाटील यांनी मानले.