जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:49 IST2017-10-07T00:49:36+5:302017-10-07T00:49:36+5:30
जिल्ह्यात सर्वत्र सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. त्यांनतर संबंधित अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात सर्वत्र सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. त्यांनतर संबंधित अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
घनसावंगीमध्ये आ. राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी व जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, मंठा, परतूर व जाफ्राबाद तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
केंद्रात व राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून ३ वर्षांत राज्यामधील शेतकºयांच्या प्रश्नांवर प्रचंड आंदोलने होऊन युती सरकारने अजूनही याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत. राज्यातील शेतक-यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून जाचक अटींचा भडीमार करुन अनेक तारखा देऊनही अद्याप एकाही शेतक-याची कर्जमाफी न झालेली नाही. ही कर्जमाफी फसवी असल्याचे लक्षात आले आहे. नुकतीच शासनाची पैसेवारीवारी ५० पैशांवर असल्याचा अहवाल दिला आहे. खरिपाच्या काळामध्ये शेतक-यांचे झालेले नुकसान तसेच पीक विमा मिळण्याच्या आशा देखील पूर्णत: धुळीस मिळाल्या आहेत. त्यातच कापसाला ३१००-३२०० चा भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याने देशात सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी करुन ज्या राजाने रयतेसाठी जीवाचे रान केले अशा राजाला या सरकारने बदनाम करण्याचे काम केले. सरकारने घोषणा करुनही कर्जमाफीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. राज्यातील आॅनलाईन कर्जमाफी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत राज्यातील ८९ लाख शेतक-यांपैकी फक्त ५० टक्के शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.