महापालिकेत राष्ट्रवादी गोंधळलेली !
By Admin | Updated: November 13, 2014 00:52 IST2014-11-13T00:47:24+5:302014-11-13T00:52:37+5:30
लातूर : मनपाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुरेसे संख्याबळ नसतानाही उमेदवारी दाखल केली. ७० सदस्य संख्या असलेल्या लातूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ १२ सदस्य आहेत.

महापालिकेत राष्ट्रवादी गोंधळलेली !
लातूर : मनपाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुरेसे संख्याबळ नसतानाही उमेदवारी दाखल केली. ७० सदस्य संख्या असलेल्या लातूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ १२ सदस्य आहेत. अर्ज भरताना राष्ट्रवादीने सेनेसोबत आघाडी केली. महापौरपदासाठी राष्ट्रवादीचा, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचा अर्ज होता. मतदानाच्या वेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली इंद्राळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर महापौर बिनविरोध निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संभाजी बसपुरे यांनी उपमहापौरपदाचा अर्ज मागे घेतला नाही. हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी हात उंच केले. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मणियार, रेहाना बासले यांनी शिवसेनेला मतदान केले. इतर दहा सदस्य मात्र तटस्थ राहिले. १२ पैकी दोघा जणांनी सेनेला मतदान केल्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी सभागृहात दिसून आली. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद सावे म्हणाले, महापौरपदी अल्पसंख्याक उमेदवार असल्याने आम्ही माघार घेतली. उपमहापौरपदासाठी मतदान झाले. त्यात आमच्या दोन सदस्यांनी सेनेला मतदान केले, तो त्यांचा अधिकार आहे. पक्षाने कोणाला मतदान करावे, यासाठी आदेश बजावले नव्हते. त्यामुळे गटबाजीचा प्रश्नच येत नाही.