नवविचारांच्या अंकुराचे जतन व्हावे
By Admin | Updated: June 2, 2015 00:23 IST2015-06-02T00:23:00+5:302015-06-02T00:23:00+5:30
औरंगाबाद : जैविक व भौगोलिक विविधतेने नटलेल्या विद्यापीठ परिसरात सृजनशील विचारांचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत

नवविचारांच्या अंकुराचे जतन व्हावे
औरंगाबाद : जैविक व भौगोलिक विविधतेने नटलेल्या विद्यापीठ परिसरात सृजनशील विचारांचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. या नव्या विचारांच्या अंकुराचे जतन व्हावे, असे प्रतिपादन जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मानवेंद्र काचोळे यांनी केले.
डॉ. काचोळे हे काल ३१ मे रोजी विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डॉ. काचोळे यांचा सेवागौरव करण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्र म झाला. यावेळी ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. काचोळे यांचा कुलगुरू यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. काचोळे म्हणाले, विद्यार्थी म्हणून विद्यापीठात दाखल झालो. आज प्राध्यापक (वरिष्ठ श्रेणी) या पदावरून निवृत्त होत आहे. आयुष्याची ४० वर्षे या परिसरात घालविली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य जतन झाले पाहिजे. शिक्षण, संशोधनाचा दर्जा राष्ट्रीय स्तरावर पोहोचला पाहिजे, असेही ते म्हणाले. विद्यापीठातील विहिरी, तलावांमध्ये मुबलक पाणी असून, स्रोत ही आपली संपत्ती आहे. त्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, अशी अपेक्षाही काचोळे यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले, डॉ. काचोळे यांच्यासारख्या वरिष्ठ प्राध्यापकांनी विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही कुलगुरू म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मोराळे यांनी केले. यावेळी डॉ. अशोक गिरी, डॉ. एस. जी. गोविंदवार, आकाशवाणीचे निवेदक मुजीफ खान, सहा. ग्रंथपाल डॉ. शाहिता परवीन आदींची उपस्थिती होती.