चार जागाही राष्ट्रवादी काँग्रेसने पटकाविल्या
By Admin | Updated: October 29, 2015 00:20 IST2015-10-28T23:59:13+5:302015-10-29T00:20:37+5:30
कळंब : नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी न्यायालयातील याचिका काढून घेतल्यानंतर बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी करण्यात आली.

चार जागाही राष्ट्रवादी काँग्रेसने पटकाविल्या
कळंब : नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी न्यायालयातील याचिका काढून घेतल्यानंतर बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या मताधिक्यांनी चारही जागांवर विजय मिळविला. त्यामुळे १८ सदस्यीय बाजार समितीत राकाँचे संख्याबळ १५ झाले आहे.
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या ३३ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी बाजार समिती निवडणुकीत मताधिकार मिळावा यासाठी चार स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. यावर मतदार यादीतील अंतिम करण्यात आलेल्या सदस्यांसह न्यायालयात गेलेल्या २९७ नवीन सदस्यांचे मतदान घेऊन या मतपत्रिका दोन स्वतंत्र मतपेटीत सीलबंद करण्यात आल्या होत्या. परंतु, १३ आॅक्टोबर रोजी मतमोजणीपर्यंत न्यायालयाचेअंतरिम निर्देश न आल्याने या चार जागांची मतमोजणी राखीव ठेण्यात आली होती. अखेर संबंधित याचिकाकर्त्यांनीच याचिका काढून घेतल्यामुळे २१ आॅक्टोबर रोजी न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याची मुभा दिली होती. यामुळे बुधवारी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सहाय्यक निबंधक सी. पी. बनसोडे, सहकारी अधिकारी ए. आर. सय्यद आदींच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सुरूवातीला झालेल्या मतमोजणीवेळी १४ पैकी ११ जागा जिंकून राकाँने बाजार समितीवर एकहाती वर्चस्व मिळविले होते. तरीही राकाँतील ‘तरूण तुर्क’ समजली जाणारी मंडळी मैदानात उतरविल्याने ग्रामपंचायत मतदार संघातील मतमोजणीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर चारही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली आहे. सर्वसाधारणमधून माजी युवक तालुकाध्यक्ष धनंजय वाघमारे, विद्यमान संचालक प्रणव चव्हाण, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून युवक तालुकाध्यक्ष अरूण चौधरी तर अ. जा. मतदारसंघातून भगवान ओव्हाळ हे उमेदवार विजयी झाले.