नाथांच्या पालखीचा खडतर प्रवास

By Admin | Updated: July 7, 2015 00:41 IST2015-07-07T00:21:09+5:302015-07-07T00:41:38+5:30

पैठण : संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या नशिबी यंदाही खडतर प्रवास लिहिलेला आहे.

Nath's palanquin ride | नाथांच्या पालखीचा खडतर प्रवास

नाथांच्या पालखीचा खडतर प्रवास


पैठण : संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या नशिबी यंदाही खडतर प्रवास लिहिलेला आहे. राज्य शासनाने आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हा पालखी मार्ग म्हणून विकसित केलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गावर फक्त संत एकनाथ महाराज पालखी मार्ग असे रेडियमचा फलक अनेक वर्षांपासून लावून ठेवला आहे. प्रत्यक्षात या मार्गाची साधी डागडुजीसुद्धा करण्यात येत नाही. यामुळे शासन मराठवाड्यातील वारकऱ्यांसोबत दूजाभाव करीत असल्याची भावना वारकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
मराठवाड्यातील वारकऱ्यांनी पैठण ते पंढरपूर हा पालखी मार्ग अद्ययावत करून द्यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे लावून धरली आहे़ वारकऱ्यांची मागणी लक्षात घेता समज काढावी तशी या मार्गावर ‘संत एकनाथ पालखी मार्ग’ असा रेडियमचा भव्य फलक गेल्या १५ वर्षांपासून लावलेला आहे; मात्र या मार्गाचे काम करण्यात आलेले नाही.
प्रस्थान त्रयी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यास मान आहे. संत एकनाथ महाराज यांच्या पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा व चांगले रस्ते कधीच मिळाले नाहीत.
बीड जिल्ह्यातील धनगरवाडी, हाटकर वाडी, गारमाथा हा अत्यंत डोंगराळ भाग असून या ठिकाणी साधा रस्तासुद्धा उपलब्ध नसल्याने डोंगरातील पायवाटेने पालखी रथ ग्रामस्थांना, वारकऱ्यांना हाताने ४ किलोमीटरपर्यंत ओढावा लागतो, तर पावसामुळे नदी-नाल्यास पूर आल्यास तो ओसरेपर्यंत वाट पाहावी लागते़ लाडजळगाव ते शेकटा, भगवानगड ते मालेगाव, मिडसावंगी ते मुंगूसवाड, राक्षसभुवन ते रायमो, खर्डा ते तिंत्रज, एकबुर्जी, नांगरडोह, रत्नपूर, अनाळे, मुंगशी, बीटरगाव, सोलापूर जिल्ह्यात कव्हे ते कव्हेदंड, गवळेवाडी, कुर्डू, अरण, करकंब यादरम्यान रस्ते खराब व वेदनादायी आहेत असे दीपक लिखिते यांनी सांगितले.
पैठण ते पंढरपूर या २५० किलोमीटरच्या रस्त्यावर फक्त संत एकनाथ महाराज पालखी मार्ग असे रेडियमचे फलक लावून बोळवण करण्यात आलेली आहे़
संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांची पालखी प्रवासादरम्यान ज्या ठिकाणी मुक्कामी थांबते त्या गावातील ग्रामपंचायत, नगर परिषद यांना राज्य शासनाच्या वतीने पालखी व्यवस्था करण्यासाठी अनुदान निधी दिला जातो, तर पालखीसोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका आदी सोयीसुविधा पुरविण्यात येतात; मात्र पैठणच्या पालखीस अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत़
संत एकनाथ महाराजांच्या पालखीस ३७५ वर्षांचा इतिहास आहे़ संत भानुदास महाराज (एकनाथ महाराज यांचे पणजोबा) हे विठ्ठलभक्त होते. ते नियमित पंढरपूरची वारी करायचे़ कर्नाटकमधील अनागोंदीचा राजा पंढरपूर येथील विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर येथून अनागोंदीला घेऊन गेला आहे़
४संत भानुदास महाराजांनी आपल्या भक्तीसामर्थ्याच्या बळावर विठ्ठलाची मूर्ती अनागोंदीच्या राजाकडून परत मिळविली आणि पंढरपूर येथे प्राणप्रतिष्ठा केली़ याचमुळे विठ्ठल मंदिरातील गरुडमंडपात संत भानुदास महाराजांची समाधी बांधण्यात आलेली आहे़ आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला करण्याचा मान संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यास आहे.
पालखी रस्त्याची किमान यंदा डागडुजी करावी़ पालखीसोबत संख्येनुसार पाण्याचे टँकर (सुस्थितीत असलेले) द्यावे. महिला व पुरुष डॉक्टर असलेले पथक पालखीसोबत देण्यात यावे़ पालखीसोबत रुग्णवाहिका देण्यात यावी, तसेच पालखी ज्या गावात मुक्कामी थांबते तेथे मुक्कामाची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात यावी, अशी मागणी पालखी प्रमुख रघुनाथबुवा यांनी केली आहे़
संत एकनाथांच्या पालखीस औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यांतून जवळपास २५० किलोमीटर अंतर पायी चालत कापावे लागते.
४यादरम्यान अनेक ठिकाणी कच्चे रस्तेसुद्धा उपलब्ध नाहीत. शेतातून पायवाटेने डोंगरातून, चिखलातून, नदी-नाल्यातून, तसेच दगडगोट्यातून त्रास सहन करीत वारकऱ्यांना पायी चालावे लागते.

Web Title: Nath's palanquin ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.