नांदेडकरांनो, जपून वापरा पाणी़
By Admin | Updated: June 28, 2014 01:18 IST2014-06-28T00:08:38+5:302014-06-28T01:18:11+5:30
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त १०़ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे़त्यात पावसाचे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने परिस्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे़
नांदेडकरांनो, जपून वापरा पाणी़
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त १०़ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे़त्यात पावसाचे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने परिस्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे़ त्यामुळे शहरावर पाणीकपातीची वेळ येण्याची शक्यता असून नांदेडकरांनी जपून पाणी वापरण्याची गरज आहे़
मागील वर्षी १ ते १९ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी़ तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़ मात्र यंदा आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मि. मी़ पाऊस झाला आहे़ त्यात यंदाच्या तीव्र उन्हामुळे विष्णूपुरीतील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले़ सध्या १० दलघमी साठा असून प्रकल्पात एकूण १३़२६ टक्के साठा आहे़ हा उपलब्ध साठा जुलैअखेर पर्यंत पुरणार आहे़ त्यामुळे आतापासूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे़ त्यासाठी नांदेडकरांनीही पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे़
बांधकामावर पाण्याचा बेसुमार वापर
बांधकामावर पाण्याचा बेसुमार वापर- शहर व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत़ यापूर्वी पाणीटंचाईच्या काळात बांधकामे थांबविण्याची आदेश देण्यात आले होते़ यंदाही परिस्थिती त्याहून वेगळी नाही़ त्यामुळे या बांधकाम होणारा पाण्याचा वापर थांबविण्याबाबत पावले उचलण्याची गरज आहे़
२०१४-१५ ची तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी अशी
नांदेड ० टक्के, अर्धापूर ०.१ टक्के, मुदखेड ० टक्के, लोहा ० टक्के, कंधार ० टक्के, देगलूर ० टक्के, मुखेड ० टक्के, नायगांव ० टक्के, बिलोली ० टक्के, धर्माबाद ० टक्के, किनवट ० टक्के, माहूर ०.३ टक्के, हदगाव ० टक्के, हिमायतनगर ० टक्के, भोकर ० टक्के, उमरी ० टक्के.
शुक्रवारी दिवसभर उकाडा अन पावसाचा शिडकावा
शुक्रवारी शहरात दिवसभर उकाडा जाणवला़ त्यात सायंकाळच्या वेळी ढगांनी गर्दी केली होती़ पाऊसही सुरु झाला़ पण तो लगेचच थांबला़
खरिपासाठी २ लाख ५४ हजार मेट्रिक टन खताची मागणी
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शासनस्तरावर २ लाख ५४ हजार ६०० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली. यापैकी २ लाख ६ हजार २०० मेट्रिक टन मंजूर झाले असून ८७२३० मे.टन तालुकास्तरावर वितरित करण्यात आले आहे. यंदा खताची टंचाई निर्माण होवू नये म्हणून कृषी विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत़ सध्या तरी, पाहिजे त्या प्रमाणात मागणी नाही़
कंपनीनिहाय मंजूर खत असे
युरिया ६८१०० हजार मे.टन, डीएपी ४८५०० हजार मे.टन, एमओपी १४९०० हजार टन, सुंयुक्त खते ३९७०० हजार टन, १५.१५ १०५०० टन, १०.२६.२६-९७०० व इतर असे मिळून एकूण २ लाख ६ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. पैकी एप्रिल महिन्यात आलेले २४ हजार ४२६ मेट्रिक टन, मे महिन्यात ३७३१४ टन तर जून महिन्यात २५ हजार ४९० टन व रबीतील शिल्लक १४ हजार ९ टन असे एकूण १ लाख १२३९ मे.टन खत प्राप्त झाले असून यापैकी ८७२३० टन खत विक्री झाले आहे.
२०१३-१४ ची तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी अशी
नांदेड ९४.९६ टक्के, अर्धापूर १२६.२० टक्के, मुदखेड १२३.६५ टक्के, लोहा ७४.१९ टक्के, कंधार ९९.११ टक्के, देगलूर ७७.१९ टक्के, मुखेड ९२.२७ टक्के, नायगाव ९०.९१ टक्के, बिलोली १४६.५९ टक्के, धर्माबाद १०८.२९ टक्के, किनवट १३३.६९ टक्के, माहूर ८१.५५ टक्के, हदगाव ८३.९६ टक्के, हिमायतनगर १२८.१५ टक्के, भोकर ९३.२५ टक्के, उमरी १०८.५५ टक्के.
१ लाख ८० हजार क्विंटल बियाणांची मागणी
खरीप हंगामासाठी १ लाख ८० हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली. यात सोयाबीन १ लाख ५७५०० क्विंटल, संकरित कापूस ७३६३ क्विंटल, सुधारित कापूस ४६५ क्विंटल, ज्वारी ५४५० क्विंटल, बाजरी १ क्विंटल, भात १७१ क्विंटल, तूर ३६०७ क्विंटल, मूग १६६५ क्विंटल, उडिद ३०२२ क्विंटल, मका १०३ क्विंटल, भुईमूग ३७, सूर्यफुल १७, तीळ ११ क्विंटल या बियाणांचा समावेश आहे. यात खाजगी कंपन्यांची १ लाख ७ हजार ७० क्विंटल तर महाबीज व अन्य कंपन्यांचे ७२३४२ क्विंटल बियाणे आहे.
बळीराजाची प्रतीक्षा संपेना
नांदेड : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून २८ जूनपर्यंत २४३०० हेक्टरवर म्हणजे केवळ तीन टक्के पेरणी झाली. यात कापूस २१६०० हेक्टर, सोयाबीन ३०० हेक्टर व अन्य तूर, उडीद व मूग या पिकांचा समावेश आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभीच खत-बियाणांची खरेदी करुन ठेवली ्असली तरी अद्याप पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.
गतवर्षी २०१३-१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रास्तावित होते, यापैकी २८ जून अखेर ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. यात ज्वार ७१ हजार ८०० हेक्टर, तूर ५० हजार ३०० हजार हेक्टर, मूग २५ हजार हेक्टर, उडीद २८ हजार १०० हेक्टर, सोयाबीन २ लाख ३३ हजार ९०० हेक्टर, गळीत धान्य १९०० हेक्टर, कापूस २ लाख ५९ हजार २०० हेक्टर याप्रमाणे एकूण ६ लाख ७६ हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु मान्सून वेळेवर दाखल न झाल्यामुळे केवळ ३ टक्के पेरणी झाली.
खत-बियाणाच्या दरात यावर्षी जवळपास दीडपटीने वाढ झाल्याने बियाणे खरेदीसाठी दमछाक होत आहे. मृग नक्षत्र सुरु होऊनही महिना उलटला तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी लाखो हेक्टर जमिन काळीभोर राहिली.
२०१४ च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनची ३ लाख हेक्टरवर, कापूस २ लाख २५ हजार हेक्टर, ज्वारी ७९००० हेक्टर, तुर ६७००० हेक्टर, मूग ३३००० हेक्टर तर उडदाचे ३२००० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.
पीकविम्यासाठी २ दिवसांची मुदत
नांदेड : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व गावांचा हवामान आधारित पीकविमा योजनेत समावेश केला असून विमा भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून ३० जून शेवटची मुदत आहे.
शेतकऱ्यांना संभाव्य पेरणीच्या आधारे विमा भरता येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक एस.जी.पडवळ यांनी केले आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश केलेला आहे. पीक पेरल्यापासून पीक तयार होण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस, पावसात खंड, अतिवृष्टीपासून नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे.
सदर योजनमध्ये कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना भाग घेता येणार असून विमा भरण्याची अंतिम मुदत ३० जून आहे. शेतकऱ्यांनी प्रतिहेक्टरी कापसासाठी ९५० रुपये, सोयाबीन ९२३ रुपये, उडदासाठी ७५६ तर मुगासाठी ६१२ रुपये भरावयाचे आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली त्यांनी पीक पेऱ्याचे प्रमाणपत्र द्यावे, पेरणी प्रमाणपत्र नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभाग घेता येणार आहे.
बँकांनी पेरणी प्रमाणपत्रासाठी आडवणूक करु नये, असे अॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीने सर्व बँकांना पत्र पाठवून सूचित केले आहे.(प्रतिनिधी)