नांदेडकरांना अल्प दरात मिळणार धान्य
By Admin | Updated: May 23, 2014 01:11 IST2014-05-23T00:36:59+5:302014-05-23T01:11:54+5:30
नांदेड: जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने धान्य महोत्सवाचे आयोजन नांदेड शहरात करण्यात येणार असल्याने नांदेडकरांना अल्प दरात धान्य उपलब्ध होणार आहे़

नांदेडकरांना अल्प दरात मिळणार धान्य
नांदेड: जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने धान्य महोत्सवाचे आयोजन नांदेड शहरात करण्यात येणार असल्याने नांदेडकरांना अल्प दरात धान्य उपलब्ध होणार आहे़ हा धान्य महोत्सव २५ ते २६ मे या कालावधीत नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित केला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी दिली आहे़ शेतकर्याच्या मालाला योग्य भाव मिळावा व ग्राहकास योग्य दराने व चांगल्या दर्जाचे शेतमाल मिळावा, या उद्देशाने हा महोत्सव घेतला जातो़ शेतकरी व ग्राहक यांच्या मधील मध्यस्थ वगळून त्यांना एकत्रित आणणे, शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची वजावट न करता शेतमालाची रक्कम तातडीने व योग्य मिळावी या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने या धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे़ सदरील महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते होणार आहे़ मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, मनपा आयुक्त जी़ श्रीकांत, जिल्हा पोलिस अधिक्षक परमजितसिंग दहिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ या धान्य महोत्सवात जिल्ह्यातून गहू, ज्वारी, सर्व दाळी व इतर शेतमाल शेतकरी स्वत: विक्रीसाठी आणणार आहेत़ शहरातील सर्व नागरिकांनी चांगल्या दर्जाचा माल खरेदी करावा व धान्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी केले आहे़ कृषी विभाग व प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा धान्य महोत्सव घेण्यात येत आहे़ गतवर्षीच्या धान्य महोत्सवात ४ हजार ९४९ क्विंटलची विक्री होऊन १ कोटी २५ लाखांची उलाढाल झाली होती. बाजारापेक्षा महोत्सवात शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. गतवर्षी ८० शेतकरी सहभागी होते. (प्रतिनिधी)