नाळवंडीच्या महिला सरपंचाचे प्रेत आढळले विहिरीत

By Admin | Updated: January 29, 2015 01:15 IST2015-01-29T00:59:52+5:302015-01-29T01:15:59+5:30

डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील महिला सरपंच कविता सुभाष डोके (वय ४४) यांचे प्रेत बुधवारी गावाजळील विहिरीत आढळले. त्या रविवारपासून बेपत्ता होत्या

Nalwandi woman Sarpanch's body found in the well | नाळवंडीच्या महिला सरपंचाचे प्रेत आढळले विहिरीत

नाळवंडीच्या महिला सरपंचाचे प्रेत आढळले विहिरीत



डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील महिला सरपंच कविता सुभाष डोके (वय ४४) यांचे प्रेत बुधवारी गावाजळील विहिरीत आढळले. त्या रविवारपासून बेपत्ता होत्या. त्यांचे प्रेत आढळल्याने तालुका हादरून गेला आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल उलटसुलट चर्चा असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कुठलेच धागेदोरे मिळाले नव्हते.
शेती हेच उपजिविकेचे त्यांचे साधन होते. त्यांच्याकडे गुरे आहेत. कधी पती, कधी मुलगा कधी सून तर कधी त्या स्वत: गुरे चारण्यासाठी जात. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी त्या जनावरे चारण्यासाठी गावाजवळील शेतात गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी त्या परतल्याच नाहीत़ त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला़ निराश होऊन नातेवाईकांनी अंमळनेर ठाणे गाठून बेपत्ताची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनीही शोध मोहीम राबविली; परंतु त्या मिळून आल्या नाहीत. नाळवंडी शिवारातीलच एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सहा वाजता एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. हे प्रेत दुसऱ्या, तिसऱ्या कोणाचे नाही तर सरपंच कविता डोके यांचेच असल्याचे तपासात पुढे आले. दरम्यान, या विहिरीत उतरून दोन दिवसांपूर्वी तपासणी केली होती; पण काहीच मागमूस लागला नव्हता. बुधवारी याच विहिरीत त्यांचे प्रेत आढळले.
पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी गावातील चुली पेटल्या नाहीत. त्यांच्यामागे पती, मुलगा, सून असा परिवार आहे. (वार्ताहर)
कविता डोके या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या़ गावाच्या विकासाची त्यांना सतत तळमळ होती. त्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी गावातील अवैध धंदे बंद पाडले होते़ त्यामुळे गाव व्यसनमुक्त झाले होते. रस्ते, नळयोजना, पथदिवे, पांदणमुक्तीसाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. बचत गटांमधून त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता.
जानेवारी २०१३ मध्ये कविता डोके नाळवंडीच्या सरपंच झाल्या. त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते.
४प्रजासत्ताक दिनी त्यांनी ‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’ यासह बचतटांच्या महिलांसाठी ग्रामसभा बोलावली होती.
४प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्या बेपत्ता झाल्या. त्यामुळे ग्रामसेवकांच्या हस्तेच ध्वजारोहण झाले. ग्रामसभाही झाली नाही.

Web Title: Nalwandi woman Sarpanch's body found in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.