नगरपालिकांनी टंचाई कक्ष स्थापन करावा
By Admin | Updated: November 29, 2014 00:28 IST2014-11-29T00:09:43+5:302014-11-29T00:28:02+5:30
जालना : जिल्ह्यातील जालना, भोकरदन, अंबड व परतूर येथील कार्यक्षेत्रातील नगरपालिकांनी पाणी टंचाईच्या निवारणासाठी सज्ज व्हावे, अशी सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केली आहे

नगरपालिकांनी टंचाई कक्ष स्थापन करावा
जालना : जिल्ह्यातील जालना, भोकरदन, अंबड व परतूर येथील कार्यक्षेत्रातील नगरपालिकांनी पाणी टंचाईच्या निवारणासाठी सज्ज व्हावे, अशी सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केली आहे. प्रत्येक नगरपालिकांनी टंचाई कक्ष स्थापन करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शुक्रवारी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वरील आदेश दिले. जिल्हाधिकारी नायक यांनी म्हटले आहे की, टंचाई निवारण तसेच नागरिकांना विविध योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरीत पाणीपुरवठा व नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील विविध कामांचे आराखडे तयार करावेत.
जिल्ह्यातील चारही नगरपालिकांनी नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी कार्यरत राहून पाणी टंचाई भासणार नाही, यासाठी बोअरवेलची कामे, नादुरूस्त झालेली पाईप लाईन, पाणी गळती इत्यादी कामे त्वरीत करावी. रहिवाशांना पाणी उपलब्ध होईल. तसेच नगरपालिकांच्या विविध कामांबाबत जसे दलित वस्ती सुधारणा करणे, मालमत्ता व पाणीपट्टी व विविध कर वसुलीसाठी कॅम्प लावणे, कामाचे मंजुरी आदेश काढणे इत्यादी बाबत बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
कर्मचाऱ्यांच्या पदाबाबत संवर्गनिहाय माहिती तयार करून रिक्त जागांचा आढावा द्यावा.
सेवापुस्तिके अद्ययावत करावीत, रोस्टर तपासण्या करणे, तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेले अनुदान व केलेली कामे तसेच उपयोगिता प्रमाणपत्र इत्यादीबाबत यावेळी चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात टंचाई सदृश परिस्थिती असल्यामुळे कर्मचारी व अधिकारी यांच्या रजा मंजूर झाल्याशिवाय मुख्यालय सोडू नये अशी सूचनाही यावेळी केली.
या आढावा बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण भगवान वीर, नगररचनाकार खरवडकर, तहसीलदार अनिता भालेराव आदी उपस्तिि होते. (प्रतिनिधी)