स्पीड गव्हर्नरशिवाय मनपाची वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:54 IST2017-08-28T00:54:45+5:302017-08-28T00:54:45+5:30
स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविल्याशिवाय व्यावसायिक वाहने रस्त्यावर धावूच नयेत, असा दंडकच परिवहन विभागाने केला आहे. औरंगाबाद महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या एकाही वाहनाला स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविलेली नाही.

स्पीड गव्हर्नरशिवाय मनपाची वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविल्याशिवाय व्यावसायिक वाहने रस्त्यावर धावूच नयेत, असा दंडकच परिवहन विभागाने केला आहे. औरंगाबाद महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या एकाही वाहनाला स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविलेली नाही. गुरुवारी सायंकाळी मनपाने ताब्यात घेतलेल्या खाजगी टँकरने सिडकोत तरुणीला चिरडले. या वाहनधारकाकडे तर कोणतीच कागदपत्रे, गव्हर्नर नसल्याचे समोर आले आहे. यांत्रिकी विभाग वाहनांना स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
स्पीड गव्हर्नर बसविण्यासंदर्भात १ मे २०१७ रोजी शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली. परिवहन आयुक्तांनी ९ मे रोजी परिपत्रक काढले. ज्या वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवलेले नसतील त्यांना फिटनेस सर्टिफिकेट न देण्याचे आदेश या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत. वाढत्या अपघाताचे कारण अतिवेग असल्यामुळे राज्यातील सर्व अवजड वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
औरंगाबाद महापालिकेकडे २८० पेक्षा अधिक वाहने स्वत:ची आहेत. या शिवाय भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांची संख्या जवळपास २५० आहे. या सर्व वाहनांना स्पीड गव्हर्नर यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे ८४ टँकर भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. या वाहनांना स्पीड गव्हर्नर यंत्रणा नाही. गुरुवारी मनपाच्या एका टँकरचालकाने सिडको एन-५ भागात एका दुचाकीस्वार तरुणीला चिरडले. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली. मनपाच्या टँकरला स्पीड गव्हर्नर बसविलेले असते तर दुर्घटना टाळता आली असती. मनपाच्या यांत्रिकी विभागातील अधिकारी व कर्मचारी शासन आदेशानुसार नवीन यंत्रणा बसविण्यास तयार नाहीत.