पालिका कर्मचारी कामावर परतले
By Admin | Updated: July 25, 2014 00:30 IST2014-07-24T23:33:17+5:302014-07-25T00:30:14+5:30
जालना : गेल्या आठ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले पालिका कर्मचारी गुरुवारी कामावर पुन्हा परतले.

पालिका कर्मचारी कामावर परतले
जालना : गेल्या आठ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले पालिका कर्मचारी गुरुवारी कामावर पुन्हा परतले.
वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी नगर पालिकांचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत संपावर गेले. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मंजूर झाल्या शिवाय संप मागे घेणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली. परिणामी हा संप चिघळणार अशी चिन्हे दिसू लागली. विशेषत: पालिके अंतर्गत सर्वच संघटनांनी एकत्रितपणे संप केल्यानंतर आठ दिवस पालिकेचे कामकाज पूर्णत: कोलमडून गेले. पावसाळ्याच्या तोंडावरच साफ सफाईची कामे पूर्णत: ठप्प झाली. त्यामुळे कचराकुंड्यांवर कचऱ्याचे ठिक ठिकाणी ढीग साचले. तसेच नाल्याही पूर्णत: तुंबल्या. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरले. संपूर्ण जालना शहरात स्वच्छतेसह अन्य नागरी सेवा कोलमडल्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले होते.
जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या पालिकांमधूनही कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. या स्थितीत जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा. व नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत हस्तक्षेप करीत, चर्चा करीत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे संघटनांनी आपला संप मागे घेतला. दरम्यान, शहरातील आठ दिवसांपासून ठप्प असलेली कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. यात प्रामुख्याने पाणी पुरवठा व स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
पालिका कार्यालय गजबजले
गेल्या आठ दिवसांपासून पालिकेच्या सर्व विभागात कमालीचा शुकशुकाट होता. स्वच्छता विभागासह अन्य विभागाची कामे पूर्णत: ठप्प होती.
कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच ठाण मांडून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पालिका कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे झाली नाहीत. गुरुवारी कर्मचारी परतल्यानंतर सर्व विभाग गजबजून गेले. नागरिकांनीही कामांसाठी गर्दी केली.