पालिका शाळा; विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक जास्त
By Admin | Updated: May 27, 2014 00:59 IST2014-05-27T00:41:51+5:302014-05-27T00:59:56+5:30
जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली.

पालिका शाळा; विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक जास्त
जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली. मात्र शिक्षक संख्या पूर्वीचीच असल्याने शिक्षक जास्त आणि विद्यार्थी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे ३० शिक्षक जादा असल्याने त्यांना जिल्हा परिषदेकडे वर्ग करावे, अशी मागणी होत आहे. या शाळांमध्ये १२५ शिक्षक व ५ शिपाई कार्यरत आहे. २००९ पासून या पदांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याउलट शिक्षणाधिकार्यांसह मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शाळांचीही दुरवस्था झालेली असून पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थी खाजगी शाळांकडे वळत आहेत. याबाबत स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २००९ ला ४८०० विद्यार्थी शिकत होते. त्याचे प्रमाण कमी कमी होत आता २००० पर्यंत आली आहे. विद्यार्थी टक्का वाढीसाठी नगर पालिकेच्यावतीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. समाजात अत्यंत दुर्लक्षित वर्गाची मुलेच येथे शिक्षण घेताना दिसतात. शाळेतील शिक्षक वर्गास ८० टक्के रक्कम राज्य शासन पगार देते व २० टक्के नगर पालिकेचा वाटा असतो. त्या २० टक्के पगाराच्या मागणीकरिता शिक्षक नेहमीच आंदोलन करतात. शाळेच्या अशा व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शिक्षण उपसंचालकांनी या विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही त्याचा काहीच परिणाम न झाल्याचे दिसते. जिल्हा परिषदेप्रमाणे शाळा व्यवस्थापन कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांची शाळेबद्दची असणारी गोडी वाढवावी, तसेच शाळा सुविधेबाबत संबंधितांनी लक्ष द्यावी अशी मागणी चिन्नादोरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी) पालकांकडून अपेक्षा नगरपालिका शाळांची दुरवस्था असल्याने या शाळांची स्थिती चांगली करून तेथे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी किमान अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेने त्यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी, अशीही मागणी केली जात आहे.